'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 11:53 IST2026-05-02T11:52:55+5:302026-05-02T11:53:32+5:30
Nitin Gadkari News: शुक्रवारी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये नितीनन गडकरी यांनी असंच एक विधान केलं ज्याची आता चर्चा होत आहे.

'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे राष्ट्रीय राजकारणात त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. जे काही मनात असेल ते गडकरी थेट बोलून टाकतात. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये नितीनन गडकरी यांनी असंच एक विधान केलं ज्याची आता चर्चा होत आहे. नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात गडकरी यांनी जातपात आणि धर्माच्या आधारावर राजकारण करणाऱ्यांना लक्ष्य केलं. 'आज काल अनेक जण जातपात आणि धर्माच्या नावावर समाजाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा राजकारणावर मी विश्वास ठेवत नाही. जातिगत राजकारणामुळे देशाचं भलं होणार नाही', असे गडकरी यांनी सांगितले.
नितीन गडकरी म्हणाले की, ज्या दराने गॅस, पेट्रोल आणि डिझेल हे हिंदूंना मिळतं, त्याच दराने ते मुस्लिमांनाही मिळतं. म्हणजेच कुठलाही विकास आणि सुविधांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. जातीपातीवर बोलून काहीही मिळत नाही. मी अशा अनेक नेत्यांना पाहिले आहे जे मंचावरून जातीपातीवर बोलतात आणि मोठमोठ्या घोषणा करतात. मात्र जेव्हा ते खाजगीत भेटतात तेव्हा त्यांचा मुलगा किंवा पत्नीसाठी तिकीट मागतात. अशा ढोंगी नेत्यांना आता जनतेने ओळखलं आहे. त्यामुळे जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ, असा टोलाही गडकरी यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, मी नेहमी स्पष्टपणे बोलतो. तसेच आपल्या भूमिकेवर ठाम राहतो. मी जे सांगितलं ते केलं नाही, असं कुणी मला विचारू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच आपल्या भाषणादरम्यान, नितीन गडकरी यांनी कामगारांचे योगदान हे देशाच्या जडणघडणीतील सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगितले. तसेच भारताची प्रगती ही केवळ यंत्रांमुळे नाही तर लाखो कामगारांची मेहनत आणि समर्पणामुळे शक्य झाली आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.