मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 12:48 IST2026-05-02T12:42:31+5:302026-05-02T12:48:56+5:30
पालघरमध्ये घडलेल्या विचित्र घटनेता दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
Palghar Accident: पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नानिवली गावात १ मे रोजी पहाटे एक अत्यंत विचित्र आणि तितकीच हृदयद्रावक घटना घडली. लग्नावरून परतताना झालेल्या एका रस्ता अपघाताने दोन जीव घेतले. एका भीषण अपघातात मेहुण्याचा मृत्यू झाला, तर तो धक्का सहन न झाल्याने जखमी भावोजीनेही जवळच्याच झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय वैभव संजय लहांगे आणि त्याचा २२ वर्षीय भावोजी नितीन काशिनाथ वरठा हे दोघे नानिवली येथे एका लग्नासाठी गेले होते. शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमारास लग्न आटोपून हे दोघे दुचाकीवरून घरी परतत होते. दुचाकी वैभव चालवत होता. नानिवली बस स्टॉपजवळ आली असता, दुचाकीचा वेग प्रचंड असल्याने वैभवचे नियंत्रण सुटले.
रस्त्याच्या कडेला असलेल्या एका सोलर लाईटच्या खांबाला दुचाकीने जोरदार धडक दिली आणि त्यानंतर ती थेट एका झाडावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे वैभवचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा हा सर्व थरार जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
जखमी भावोजीने उचलले टोकाचे पाऊल
दुचाकीच्या मागे बसलेला नितीन वरठा हा या अपघातात जखमी झाला होता. मात्र, शुद्धीवर आल्यावर जेव्हा त्याने वैभव रक्ताच्या थारोळ्यात पडला असून त्याचा मृत्यू झालाय हे पाहिलं, तेव्हा नितीनला प्रचंड मानसिक धक्का बसला. जखमी अवस्थेतच त्याने शेजारच्या वाडीत धाव घेतली आणि आपल्याच पँटच्या साहाय्याने झाडाला लटकून आत्महत्या केली.
एकाच वेळी दोन मृत्यूंनी गाव हादरलं
सकाळी जेव्हा ग्रामस्थांनी एका बाजूला अपघातातील मृतदेह आणि दुसरीकडे झाडाला लटकलेला मृतदेह पाहिला, तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला हा प्रकार काय आहे हे कोणालाच उमजले नाही, मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आणि घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला.
नितीनच्या पश्चात त्याची पत्नी आणि केवळ दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे लहांगे आणि वरठा या दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पालघर जिल्ह्यात या घटनेची चर्चा सुरू आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच मनोर पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मनोर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अपघाताच्या वेळी वेगाची मर्यादा किती होती आणि अन्य काही तांत्रिक बिघाड होता का, याचीही तपासणी केली जात आहे.