Mamata Banerjee : "माझ्यावर हल्ला झाल्यास पंतप्रधान, भाजपाचे सर्व नेते जबाबदार..."; ममता बॅनर्जींना कशाची भीती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 14:15 IST2026-03-17T14:14:19+5:302026-03-17T14:15:24+5:30
Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Mamata Banerjee : "माझ्यावर हल्ला झाल्यास पंतप्रधान, भाजपाचे सर्व नेते जबाबदार..."; ममता बॅनर्जींना कशाची भीती?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आज एका जाहीर सभेत बोलताना त्या म्हणाल्या की, "माझ्यावर हल्ला होऊ शकतो आणि जर असं झालं, तर पंतप्रधानांपासून भाजपाच्या सर्व नेत्यांपर्यंत सर्वजण याला जबाबदार असतील." यावेळी त्यांनी भाजपा खासदार दिलीप घोष यांच्या एका विधानाचा उल्लेख केला. ही सर्व प्रक्षोभक विधानं असून, भविष्यात अशा विधानांमुळेच आपल्यावर हल्ला होऊ शकतो, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
ममता बॅनर्जींनीपश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना पदावरून हटवल्याच्या प्रकरणावरही जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, "निवडणूक आयोग महिलाविरोधी आहे, म्हणूनच ते मध्यरात्री एका महिला मुख्य सचिवांना त्यांच्या पदावरून हटवत आहेत." तसेच आयोग बरंच काही बदलू शकतं, पण ते सरकार बदलू शकत नाहीत, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर लगेचच मुख्य सचिव नंदिनी चक्रवर्ती, राज्य पोलीस प्रमुख पीयूष पांडे, कोलकाता पोलीस आयुक्त सुप्रतिम सरकार आणि पश्चिम बंगालचे गृह सचिव जगदीश प्रसाद मीना यांना पदावरून हटवलं आहे. या कारवाईनंतर मुख्यमंत्री आक्रमक झाल्या आहेत. आयोगाने स्पष्ट केलं आहे की, या अधिकाऱ्यांना निवडणुकीशी संबंधित कोणतंही काम दिलं जाणार नाही.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना हटवल्याच्या निषेधार्थ ममता बॅनर्जींनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहिलं आहे. ही कारवाई 'मनमानी' आणि 'गंभीर चिंतेचा विषय' असल्याचं सांगत त्यांनी लिहिलं की, भविष्यात आयोगाने अशा प्रकारचे एकतर्फी निर्णय घेणं टाळलं पाहिजे. आयोगाकडे अधिकारी बदलण्याचे अधिकार असले, तरी मागील निवडणुकांमध्ये घटनात्मक गोष्टी आणि प्रशासनासार राज्य सरकारशी सल्लामसलत केली जात होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.