Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 08:31 IST2026-04-27T08:29:25+5:302026-04-27T08:31:06+5:30
Weather Forecast: संपूर्ण भारत सध्या कडाक्याच्या उन्हाने होरपळून निघत असून हवामान विभागाने नागरिकांना पुढील तीन दिवस काळजी घेण्याची आवाहन केले आहे.

Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
संपूर्ण भारत सध्या कडाक्याच्या उन्हाने होरपळून निघत आहे. वायव्य आणि मध्य भारतात उष्णतेच्या लाटेने कहर केला असून नागरिक हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. या कालावधीत नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच एप्रिलअखेरीस उन्हाचा चटका कमी होण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य आणि मध्य भारतात पुढील तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहील. विशेषतः हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे 'या' राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे तापमानात घट होणार असली, तरी नागरिकांनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले.
मे महिन्याच्या सुरुवातीला मिळणार दिलासा
दरम्यान, वायव्य भारतात २९ आणि ३० एप्रिल रोजी तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने घट होऊ शकते. तर, मध्य भारतात २८ ते ३० एप्रिल दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तापमान २ ते ३ अंशांनी खाली येईल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रात १ मे पर्यंत तापमानाचा पारा २ ते ३ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मे महिन्याची सुरुवात काहीशी सुसह्य ठरेल. गुजरातमध्ये २९ एप्रिल ते २ मे या कालावधीत तापमानात २ ते ३ अंशांची घट अपेक्षित आहे.