Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 09:20 IST2026-04-27T09:18:47+5:302026-04-27T09:20:49+5:30
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जगात खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद आता भारतीय राजकारणातही उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावर भाष्य करताना केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला.

Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जगात खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद आता भारतीय राजकारणातही उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावर भाष्य करताना केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला. "भारतातील सद्यस्थिती ही अमेरिकेतील परिस्थितीशी मिळतीजुळती आहे," असा दावा त्यांनी केला आहे.
नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर सडकून टीका केली आणि त्याचा संबंध भारतीय राजकारणाशी जोडला. ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे विश्लेषण करताना वडेट्टीवार म्हणाले की, "जसे पेराल, तसे उगवेल... आपल्या कर्मांची फळे प्रत्येकालाच भोगावी लागतात. ट्रम्प यांनी सत्तेत असताना आणि सर्वोच्च पदावर असताना संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवण्याच्या उद्देशाने अनेक राष्ट्रांना आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच अहंकारातून आणि चुकीच्या धोरणांमुळे अमेरिकन जनतेत असंतोष निर्माण झाला आणि त्याचेच रुपांतर या हल्ल्यात झाले आहे."
केंद्र सरकारला इशारा
विजय वडेट्टीवार यांनी भारतातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना म्हटले की, "ज्याप्रमाणे अमेरिकेत घटना घडल्या, अगदी तसाच घटनाक्रम सध्या भारतातही सुरू आहे. अमेरिकेत लोक रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहेत. मात्र, भारतात सध्या तशी आंदोलने दिसत नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांना वाटते की 'सर्व काही आलबेल' आहे. परंतु, प्रत्यक्षात लोकांच्या मनात मोठा असंतोष असून, भारत देशही विनाशाच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशी भावना जनतेत आहे."
वडेट्टीवार यांच्या वक्तव्याची चर्चा
एका उच्च पदस्थ व्यक्तीवर असा हल्ला होणे दुर्दैवी असल्याचे मान्य करतानाच, वडेट्टीवार यांनी हा एक स्पष्ट इशारा असल्याचे सांगितले. "जर एखादा नेता जनतेच्या भावनेचा विचार न करता मनमानी वर्तन करत असेल, तर जनता त्यांना नक्कीच जाब विचारते आणि जबाबदार धरते," असेही त्यांनी स्पष्ट केले. वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.