“हरीशला बरे करतो”; औषधी पुड्या घेऊन बाबा घरी आले, वडिलांना भेटले, पुढे कुटुंबाचा निर्णय काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 16:31 IST2026-03-15T16:24:46+5:302026-03-15T16:31:18+5:30
Harish Rana News: हरीश राणाला दयामरणाची परवानगी देण्यात आली आहे. कोणाचे औषध किंवा प्रार्थना कधी काम करेल हे कधीच कळत नाही.

“हरीशला बरे करतो”; औषधी पुड्या घेऊन बाबा घरी आले, वडिलांना भेटले, पुढे कुटुंबाचा निर्णय काय?
Harish Rana News:सर्वोच्च न्यायालयाने इतिहासात पहिल्यांदाच दयामरणाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. १३ वर्षे कोमात असलेल्या ३२ वर्षे वयाच्या एका व्यक्तीला जिवंत राखणारी कृत्रिम जीवरक्षक प्रणाली काढून घेण्यास न्यायालयाने संमती दिली. दयामरणासंदर्भात केंद्र सरकारने सर्वसमावेशक कायदा करण्याचा विचार करावा असेही त्यात म्हटले आहे. पुढील प्रक्रिया केली जात आहे. परंतु, यातच एक बाबा औषधी पुड्या घेऊन हरीश राणाच्या घरी पोहोचले आणि उपचार करण्याबाबत विनंती केली. हरीशच्या वडिलांनीही त्या बाबाची भेट घेतली.
गाझियाबादचा रहिवासी व पंजाब विद्यापीठाचा विद्यार्थी असलेला हरीश राणा हा २०१३ साली एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तेव्हापासून तो कोमात आहे. राणा याला पॅलिएटिव्ह केअरमध्ये दाखल करून त्याच्यावरचे वैद्यकीय उपचार थांबविण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिल्लीतील एम्सला खंडपीठाने दिले.
आयुर्वेदिक औषधांनी त्यांचा आजार बरा करण्याचा दावा
राजस्थानातील एका बाबाने हरीश राणाच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी औषधी वनस्पती आणि आयुर्वेदिक औषधांनी त्यांचा आजार बरा करण्याचा दावा केला. बाबा कुटुंबाला भेटण्यासाठी सोसायटीच्या गेटवर सुमारे ६ तास वाट पाहत होते. पण, कुटुंबाने हरीशची प्रकृती आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे कारण देत उपचार नाकारले. कोणीही आले नाही तेव्हा त्यांनी पत्र पाठवले. त्यानंतर हरीशचे वडील अशोक राणा त्यांना भेटायला गेले.
कोणाचे औषध किंवा प्रार्थना कधी काम करेल हे कधीच कळत नाही
अशोक राणा म्हणाले की, त्या बाबांना पाणी आणि ज्यूस दिला. संभाषणादरम्यान त्यांनी स्पष्ट केले की, हरीशवर सर्व प्रकारचे उपचार झाले आहेत. डॉक्टरांनी पुष्टी केली आहे की, त्याच्या मेंदूतील नसा सुकल्या आहेत आणि रक्तपुरवठा योग्यरित्या होत नाही. याचा मेंदूवर सर्वात जास्त परिणाम झाला आहे. यावर, बाबांनी अनेक औषधी वनस्पती आणि आयुर्वेदिक औषधांची नावेही सांगितली. अशोक राणा यांनी बाबांचा मोबाईल नंबर घेतला आहे. ते अशाच आजारांनी ग्रस्त असलेल्या अनेक मुलांच्या पालकांच्या संपर्कात आहेत. त्यांना बाबांबद्दल माहिती देणार आहेत. कोणाचे औषध किंवा प्रार्थना कधी काम करेल हे कधीच कळत नाही, असे ते म्हणाले.
आयुर्वेदिक उपचारांनी बरा होऊ शकतो
ते बाबा म्हणाले की, जेव्हा त्यांना बातम्यांमध्ये हरीशबद्दल कळले तेव्हा ते सेवेच्या भावनेतून आयुर्वेदिक औषधे घेऊन येथे आले. त्यांनी असा दावा केला की, जर कोमा किंवा अर्धांगवायूच्या रुग्णाला वेळेवर त्यांच्याकडे आणले तर तो आयुर्वेदिक उपचारांनी बरा होऊ शकतो. त्यांनी सांगितले की, अलीकडेच एका मुलाच्या पालकांनी उपचारांवर सुमारे ४० लाख खर्च केले आणि त्यांना कोणताही फायदा झाला नाही, तर त्यांनी अवघ्या चार दिवसांत मुलाला कोमातून बाहेर काढले.