दोस्ती ‘द एंड’:‘विजय’साठी काँग्रेसने दिला मैत्रीचा बळी! संसदेत बसण्यासाठी काँग्रेसपासून चार हात लांबची जागा देण्याचे कनिमोळींचे लोकसभाध्यक्षांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:26 IST2026-05-09T11:26:13+5:302026-05-09T11:26:13+5:30
काँग्रेसशी संबंध संपल्याची घोषणा

दोस्ती ‘द एंड’:‘विजय’साठी काँग्रेसने दिला मैत्रीचा बळी! संसदेत बसण्यासाठी काँग्रेसपासून चार हात लांबची जागा देण्याचे कनिमोळींचे लोकसभाध्यक्षांना पत्र
चंद्रशेखर बर्वे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :काँग्रेसने तामिळनाडूत थलापती विजय यांच्या पक्षाला दिलेल्या पाठिंब्यामुळे द्रमुकचे पित्त खवळले आहे. काँग्रेसशी आता कोणताही संबंध राहिला नाही. अशात, द्रमुकच्या खासदारांना बसण्यासाठी काँग्रेसपासून चार हात लांबची जागा द्यावी, अशी विनंती द्रमुक नेत्या कनिमोळी यांनी केली आहे. यामुळे काँग्रेस आणि द्रमुकची जवळपास ५६ वर्षांची मैत्री संपुष्टात आली आहे.
काँग्रेसने तामिळनाडूत सरकार स्थापन करण्यासाठी थलापती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाला पाठिंबा दिला आहे. ही बाब खूप जिव्हारी लागल्यामुळे द्रविड मुन्नेत्र कळघमने (द्रमुक) काँग्रेससोबतच्या संबंधावर आज स्वत:च विरजण सोडले. द्रमुकच्या ज्येष्ठ नेत्या आणि खा. कनिमोळी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे.
त्यांनी ७ मे रोजी लोकसभाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात बदललेल्या राजकीय परिस्थितीचा स्पष्ट उल्लेख केला आहे. आमची मैत्री संपुष्टात आल्याने द्रमुकच्या खासदारांनी सभागृहात काँग्रेसच्या सदस्यांसोबत बसणे योग्य नाही. यामुळे द्रमुकच्या खासदारांना काँग्रेसपासून लांब जागा द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.