हरिश गुप्तानवी दिल्ली : महाराष्ट्र, केरळ व अन्य सात राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकारने अधिक कडक भूमिका घेतली आहे. कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे तसेच कंटेनमेंट झोनबाबत केलेले नियम ३१ मार्चपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
कोरोनाच्या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्राने याआधी जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी या नऊ राज्यांनी केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच नागरिकांनी नियम पाळावेत म्हणूनही फारसे प्रयत्न या राज्यांनी केले नसल्याचा केंद्राचा दावा आहे. राज्यांनी वेळीच प्रतिबंधात्मक पावले उचलली नाहीत तर आम्ही अधिक कडक धोरण राबवू, असा इशारा केंद्राने दिला आहे. कोरोना साथ नियंत्रणात आणण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा कालावधी महिनाभर वाढविण्यात आला आहे.