म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 17:17 IST2026-04-22T17:16:47+5:302026-04-22T17:17:12+5:30
गोरखपूरमध्ये पाळीव म्हशीला रेबीज झाल्यामुळे ३० जण रुग्णालयात दाखल. रेबीजबाधित म्हशीचे दूध सेवन केल्याने नागरिकांमध्ये भीती.

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि प्रबोधन करणारी घटना समोर आली आहे. एका पागल कुत्र्याने चावलेल्या म्हशीचे दूध सेवन केल्यामुळे तब्बल ३० जणांना अँटी-रेबीज इंजेक्शन घेण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे उरुवा क्षेत्रातील बेसहनी गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बेसहनी गावातील अभय नाथ यांच्या म्हशीला दोन महिन्यांपूर्वी एका पागल कुत्र्याने चावा घेतला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले किंवा ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. दोन महिने म्हशीचे दूध सर्रास काढले जात होते आणि परिसरातील ग्राहक ते दूध वापरत होते. मात्र, १६ एप्रिलच्या सुमारास म्हशीने अचानक चारा-पाणी खाणे बंद केले आणि तिच्या वर्तणुकीत विचित्र बदल झाले.
अभय नाथ यांनी तातडीने पशुवैद्यकीय डॉक्टरांना पाचारण केले. तपासणीअंती त्या म्हशीला रेबीज झाल्याचे उघड झाले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान १७ एप्रिल रोजी त्या म्हशीचा मृत्यू झाला.
दुधामुळे पसरली भीती
म्हशीचा मृत्यू रेबीजमुळे झाल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली. या दोन महिन्यांच्या काळात म्हशीचे दूध अभय नाथ यांच्या कुटुंबातील १५ आणि दूध काढणाऱ्या संत यादव यांच्या कुटुंबातील १५ अशा एकूण ३० जणांनी सेवन केले होते. यामुळे या ३० जणांच्या जिवाची धाकधूक वाढली आणि तातडीने त्यांनी उरुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली.
डॉक्टरांचा सल्ला आणि खबरदारी
या प्रकारानंतर उरुवा पीएचसीचे प्रभारी डॉ. जे.पी. तिवारी यांनी आरोग्य पथकासह गावात जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली. डॉ. तिवारी यांनी स्पष्ट केले की, रेबीजबाधित म्हशीचे दूध प्यायल्याने संसर्ग होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळेच खबरदारी म्हणून सर्वांना अँटी-रेबीज इंजेक्शन देण्यात आले आहे.
मात्र, घाबरलेल्या नागरिकांना दिलासा देताना डॉक्टरांनी सांगितले की, जर दूध नीट उकळून किंवा चहाच्या स्वरूपात गरम करून प्यायले असेल, तर धोका कमी असतो. परंतु, ज्यांनी कच्चे दूध वापरले आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन इंजेक्शन घेणे अनिवार्य आहे. सध्या ३० जणांवर उपचार पूर्ण झाले असून, ही घटना ग्रामीण भागात चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरली आहे.