“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:44 IST2026-04-21T12:39:48+5:302026-04-21T12:44:25+5:30
Tej Pratap Yadav News: दौरे करून, एकमेकांवर दोषारोप करून काहीही साध्य होणार नाही. त्यांना खुर्चीचा लोभ जडला आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
Tej Pratap Yadav News:बिहार सरकारमधील माजी मंत्री आणि जनशक्ती जनता दलाचे संस्थापक तेज प्रताप यादव यांनी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. प्रियंका गांधी इंडिया आघाडीचा नवा चेहरा बनू शकतात का, या प्रश्नावर बोलताना तेज प्रताप यादव यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
बिहारच्या राजकारणावर राहुल गांधींनी केलेल्या अलीकडील वक्तव्यावर तेज प्रताप यादव म्हणाले की, राहुल गांधी या सगळ्यात अडकून राहतील. सुरुवातीपासूनच बुलेट चालवण्याची त्यांची आवड पूर्ण झाली नाही. आता त्यांना खुर्चीवर बसण्याचा लोभ जडला आहे. लोभापासून दूर राहा. त्यांनी स्वयंपाकच करत राहावा, असा टोला तेज प्रताप यांनी लगावला.
प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात
फक्त प्रियांका गांधीच इंडिया आघाडीला चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात. त्या इंदिरा गांधींसारख्या आहेत; राहुल गांधींना ते जमणार नाही. दौरे करून, एकमेकांवर दोषारोप करून काहीही साध्य होणार नाही. आता ते नितीश कुमारबद्दल बोलत आहेत. नितीश कुमार आता बिहारच्या राजकारणात असणार नाहीत. दुसरा माणूस येऊन मुख्यमंत्री झाला आहे. या घडामोडी सुरू असताना राहुल गांधी मात्र वेगळ्याच ठिकाणी आहेत. राहुल गांधींना बिहारच्या सिंहासनावर बसायचे आहे का, असा सवाल तेज प्रताप यादव यांनी केला.
दरम्यान, राहुल गांधी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला होता. नितीश कुमार हे 'तडजोड केलेले' नेते आहेत, असे म्हटले होते. भाजपाचे जेडीयू आणि नितीश कुमार यांच्यावर पूर्ण नियंत्रण होते. भाजपा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवू शकले, कारण ते दबावाखाली होते. राज्यसभा सदस्य झाल्यापासून ते एक शब्दही बोलले नाहीत, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.