बिहार राज्यसभा मतदानासाठी रांगा ! पण काँग्रेसचे दोन आमदार 'नॉट रिचेबल'; तेजस्वी यादव म्हणतात 'अफवा', पण राजकीय वर्तुळात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 10:49 IST2026-03-16T10:48:48+5:302026-03-16T10:49:19+5:30
Bihar Rajya Sabha Election 2026: आरजेडीचे ए. डी. सिंह पाचव्या जागेसाठी निवडणुकीच्या मैदानात. ४१ मतांचे गणित आणि ओवेसींच्या AIMIM चा पाठिंबा. वाचा सविस्तर विश्लेषण.

बिहार राज्यसभा मतदानासाठी रांगा ! पण काँग्रेसचे दोन आमदार 'नॉट रिचेबल'; तेजस्वी यादव म्हणतात 'अफवा', पण राजकीय वर्तुळात खळबळ
पाटणा: बिहारमधील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून फोडाफोडीच्या राजकारणाने जोर धरला आहे. अशातच राज्यसभेसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच काँग्रेसचे दोन आमदार अचानक 'गायब' झाल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे महाआघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले असून, राजकारणात "मैत्री की निष्ठा?" असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काँग्रेसचे दोन महत्त्वाचे आमदार सकाळपासून कोणाच्याही संपर्कात नसल्याने ते क्रॉस वोटिंग करणार का? अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत. "सर्व काही सुरळीत असून या केवळ भाजपकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवा आहेत," असा दावा तेजस्वी यांनी केला आहे.
राजकीय पेचप्रसंग, काँग्रेसची चिंता
जर हे दोन आमदार परतले नाहीत किंवा त्यांनी विरोधात मतदान केले, तर काँग्रेस आणि महाआघाडीसाठी हा मोठा धक्का असेल. काँग्रेसने आपला विधिमंडळ पक्षनेता आणि सचेतक घोषित केलेला नाही. त्यामुळे काँग्रेसचे आमदार कोणत्याही औपचारिक मार्गदर्शनाशिवाय किंवा आदेशाशिवाय या महत्त्वपूर्ण निवडणुकीत मतदान करत आहेत. यामुळे 'क्रॉस वोटिंग'ची शक्यता बळावली असून राजकीय विश्लेषकांचे लक्ष काँग्रेसच्या प्रत्येक हालचालीवर खिळले आहे.
फोडाफोडीच्या भीतीने 'हॉटेल पॉलिटिक्स'
महाआघाडीने आपल्या आमदारांना एकसंध ठेवण्यासाठी 'हॉटेल पॉलिटिक्स'चा आधार घेतला आहे. रविवारपासूनच अनेक आमदारांना पाटण्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत काही काँग्रेस आमदार हॉटेलवर न पोहोचल्याने महाआघाडीच्या गोटात खळबळ उडाली होती.
मतांचे गणित आणि पाचव्या जागेचा पेच
राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ४१ मतांची आवश्यकता आहे. बिहार विधानसभेतील २४३ आमदारांच्या संख्याबळाचा विचार करता एनडीएकडे २०२ आमदार आहेत, ज्यांच्या जोरावर त्यांच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात. पाचव्या जागेसाठी एनडीएला आणखी ३ मतांची गरज भासू शकते. ही मते मिळवण्यासाठी महाआघाडीच्या आमदारांमध्ये फूट पडणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. महाआघाडीने आरजेडीचे विद्यमान खासदार अमरेंद्र धारी सिंह यांना पुन्हा मैदानात उतरवून एनडीएला आव्हान दिले आहे. या जागेवर विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांच्या गणिताने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
AIMIM ची भूमिका ठरणार निर्णायक
या निवडणुकीत ओवेसी यांच्या AIMIM पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. महाआघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एमआयएमच्या मतांची गरज पडू शकते. त्यामुळे ऐनवेळी ओवेसींचा पक्ष कोणाला साथ देतो, यावर विजयाचे समीकरण अवलंबून आहे.