पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:10 IST2026-05-06T12:06:00+5:302026-05-06T12:10:52+5:30
पश्चिम बंगालचे निकाल आल्यानंतर पुढच्या वर्षी ज्या राज्यांमध्ये निवडणुका होत आहे, तेथील भाजपा विरोधी पक्ष सावध झाले आहेत. अखिलेश यादव यांनी निवडणूक रणनीती ठरवणाऱ्या आयपॅकसोबतचा करार रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
चार राज्यातील विधानसभा निवडणूका पार पडल्या. पण, यात दोन राज्यातील निकालांनीच सगळ्यांना धक्का दिला. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने प्रचंड बहुमत मिळवले, तर तामिळनाडूत विजय यांचा टीव्हीके पक्ष सत्तेच्या जवळ पोहोचला. यात पश्चिम बंगाल आणि आसाममधील निकालाने भाजपाविरोधी पक्ष मात्र सावध झाल्याचे दिसत आहेत. पुढच्या वर्षी निवडणूक होऊ घातलेल्या उत्तर प्रदेशात याचे परिणाम होताना दिसत आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आयपॅक या निवडणूक रणनीती ठरवणाऱ्या संस्थेसोबतचा आपला करारच रद्द केला आहे.
अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने निवडणूक रणनीती आणि सोशल मीडियाशी संबंधित काम अडीच महिन्यापूर्वी दोन कंपन्यांना दिले होते. यात एक कंपनी होती IPAC आणि दुसरी कंपनी होती शो टाइम. पण, आता आयपॅक समाजवादी पार्टीसाठी काम करणार नाहीये.
शो टाइम काम सुरूच ठेवणार
एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आयपॅकची टीम उत्तर प्रदेशातील त्या मतदारसंघांमध्ये काम करत होती, जिथे विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यातील मतांचे अंतर खूप कमी होते.
आयपॅकची बहुतांश टीम या उत्तर प्रदेश बाहेर राहूनच काम करत होत्या. पण, आता समाजवादी पार्टीने त्यांच्यासोबतचा करार रद्द केला आहे. शो टाइम त्यांचे काम सुरूच ठेवणार आहे.
समाजवादी पार्टीने आयपॅकसोबतचा करार का केला रद्द?
राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीती आणि सोशल मीडियाचे काम करण्यासाठी आयपॅक प्रसिद्ध आहे. यापूर्वी अनेक पक्षाचे काम आयपॅकने केले आहे. मात्र, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या काळातच या संस्थेचे संचालक विनेश चंदेल यांना बंगाल कोळसा घोटाळा प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली.
या अटकेमुळे कंपनीच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले. निवडणूक आयोगाने आमच्या कार्यालयांवर टाकलेले छापे आणि संचालकांना झालेली अटक, यामुळेच समाजवादी पार्टीसोबत झालेला करार डळमळीत झाला होता. पश्चिम बंगालमध्ये आयपॅक वादात सापडल्याने समाजवादी पार्टीने या कंपनीसोबत काम करणे थांबल्याचेही सांगितले जात आहे.