लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातून जाणाऱ्या वळण रस्त्यावरील करण चौफुलीवर खड्डे पुन्हा ‘जैसे थे’ झाले आहेत़ पावसात येथे टाकलेला मुरूम पूर्णपणे वाहून गेल्याने १५ दिवसातच बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले आहे़शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गासह शहादा व मध्यप्रदेशातील वाहनांसाठी शहरातील करण चौफुली ही मध्यवर्ती ठिकाण आहे़ याठिकाणी पालिकेने सुशोभिकरणही केले आहे़ परंतु हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याने डागडूजी करण्याचे अधिकारही त्यांनाच आहेत़ गेल्या अनेक वर्षात रस्ता दुरूस्ती झालेली नसल्याने तीन ते चार मीटर व्यास आणि दोन फूट खोली असलेले खड्डे या ठिकाणी निर्माण झाले आहेत़ हे खड्डे न भरल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे़ मार्गावर निर्माण झालेले खड्डे बुजवले जावेत यासाठी जयहिंद फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर हा मुरूम टाकण्यात आला होता़ गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग पावसात हा मुरुम वाहून गेल्याने नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे़
करण चौफुलीवरचा मुरूम गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 1:31 PM