लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील भाजीपाला विक्रेते व फेरीवाल्यांना पालिकेतर्फे बसस्थानकात विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी तेथेच दुकाने लावावीत. जे व्यावसायिक रस्त्यावर गाड्या उभ्या करतील. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. दरम्यान बुधवारी व्यावसायिकांसाठी पालिकेने शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या आॅईल मीलच्या जागेवर जागा निश्चित केली होती. परंतु विरोध झाल्यामुळे एका रात्रीतून प्रशासनास निर्णय मागे घ्यावा लागला. त्यामुळे प्रशासन व पालिकांमधील समन्वयाचा अभाव विषयी एकच चर्चा होती.दिवसा गणिक कोरोना महामारीच्या संसर्गात अधिक वाढ होत आहे. साहजिकच प्रशासनाची चिंतादेखील वाढली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांमध्येही बदल करण्यात येत आहे. विशेषत: भाजीपालाच्या बाजारात सद्या मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते व इतर किरकोळ व्यावसायिकांच्या जागेत पालिकेने बदल करण्याचे नियोजन केले आहे. या व्यावसायिकांसाठी पालिकेने सुरूवातीला शहरापासून तब्बल एक किलोमीटर अंतर असलेल्या भारत आॅईल मीलची जागा निश्चित केली होती. त्याठिकाणी तालुका प्रशासनाच्या उपस्थितीत पालिकेने जागेची साफ-सफाईदेखील केली होती. तथापि एवढ्या लांब अंतरावर ग्राहक येणार नाहीत. ही शक्यता लक्षात घेऊन व्यावसायिकांनी तेथे जाण्यास स्पष्ट नकार देत दुसऱ्या म्हणजे नजिकच्या ठिकाणाला पर्याय दिला होता. याबाबत पालिका पदाधिकारी, प्रशासन व महसूल प्रशासनाने आपसात चर्चा करून बसस्थानकाची जागा निश्चित करून थेट आखणी केली.एका रात्रीतून जागेचा फेर निर्णय बदलल्यामुळे नागरिकांबरोबरच व्यावसायिकही अवाक् झालेत. पालिका व महसूल प्रशासनाच्या समन्वयाअभावी पालिकेचा खर्च वाया गेलाच. परंतु कर्मचाऱ्यांची मेहनतदेखील निष्फळ ठरली. दरम्यान पालिकेने भाजी, फळ विक्रेते व इतर किरकोळ व्यावसायिकांना बसस्थानकात पुरेशी जागा उपलब्ध करून दिली आहे. आता त्यांनी येथेच आपली दुकाने थाटावी. रस्त्यावर दुकाने लावलीत तर अशा व्यावसायिकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक खोळंबल्यामुळे वरूनच माल मिळत नसल्याचे सबब पुढे करत शहरात अजूनही काही व्यापारी चढ्या दराने मालाची विक्री करत नागरिकांची आर्थिक लुट करीत असल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने त्यांचे फावले आहे. वास्तविक हा प्रकार सर्रास घडत असल्याचे नागरिक सांगत असतांना प्रशासन त्यांना साधी ताकीद द्यायलाही तयार नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
भाजीपाला विक्रेत्यांची तळोदा बसस्थानकात सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 12:50 PM