चोरांची तऱ्हाच न्यारी! पॉश गाडी, फ्लॅट अन् विमानाने प्रवास; राजस्थानची टोळी, महाराष्ट्रात सहा चोऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 13:19 IST2024-08-09T13:19:25+5:302024-08-09T13:19:49+5:30

एकाच दणक्यात पाच-सात चोऱ्या केल्या की विमानाने आपल्या राज्यात निघून जायचे. चोरीची ही अजब तऱ्हा आहे राजस्थानातल्या ‘फौजी टोळी’ची...

posh car, flat and plane travel; Rajasthan gang, six thieves in Maharashtra | चोरांची तऱ्हाच न्यारी! पॉश गाडी, फ्लॅट अन् विमानाने प्रवास; राजस्थानची टोळी, महाराष्ट्रात सहा चोऱ्या

चोरांची तऱ्हाच न्यारी! पॉश गाडी, फ्लॅट अन् विमानाने प्रवास; राजस्थानची टोळी, महाराष्ट्रात सहा चोऱ्या

नांदेड : मोठ्या शहरातील पॉश वस्त्या गुगलवरून सर्च करायच्या, तेथे पॉश इमारतीत फ्लॅट भाड्याने घेऊन काही दिवस राहायचे, महागड्या गाड्या चोरून त्याच गाड्यांनी फिरायचे, घरांची रेकी करायची, घरावर खूण करायची आणि संधी मिळताच हात मारायचा. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या मोठ्या शहरात शिफ्ट व्हायचे. एकाच दणक्यात पाच-सात चोऱ्या केल्या की विमानाने आपल्या राज्यात निघून जायचे. चोरीची ही अजब तऱ्हा आहे राजस्थानातल्या ‘फौजी टोळी’ची...

सर्वात आधी नागपुरात मारला हात
सतपाल सिंह ऊर्फ सतपाल फौजी (४३, रा. गुरुग्राम, हरयाणा) हा या टोळीचा ‘म्होरक्या’ असून विकास ऊर्फ पवन शर्मा (रा. राजस्थान), विक्रमजित रामचंद्र व जितेंद्र ऊर्फ जॉनी मुरारीलाल सोनी (रा. हरयाणा) हे सदस्य आहेत. या टोळीने महाराष्ट्रात सर्वप्रथम नागपूरला, त्यानंतर सोलापूर, कर्नाटकातील बिदर, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर येथे चोरी केली. त्यानंतर सतपाल सिंह हा हैदराबाद येथून विमानाने घरी लग्न असल्याने दिल्लीला गेला. 

राजस्थानात आवळल्या टोळीच्या मुसक्या 
या टोळीने लातूरमधील बिसेननगर येथील सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक योगिराज फड यांच्या घरी तब्बल १९ लाखांच्या दागिन्यांची चोरी केली. 

यातील आरोपी राजस्थानला पळून गेले असता १८ मे रोजी अजमेरनजीकच्या किशनगंज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. लातूर पोलिसांनी राजस्थानमधील उदयपूर कारागृहातून सतपाल सिंह व विकास शर्मा या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी महाराष्ट्रातील सहा चोऱ्यांची कबुली दिली.
..........

Web Title: posh car, flat and plane travel; Rajasthan gang, six thieves in Maharashtra