ओबडधोबड रस्त्यावर दुचाकींची भीषण धडक; लग्नावरून परतणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू, २ गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:29 IST2026-05-08T16:27:33+5:302026-05-08T16:29:28+5:30
अर्धापूरजवळ अपघातात अजिंक्य चाटसे आणि अभिषेक नागठाणे यांचा मृत्यू; प्रवाशांचा संताप.

ओबडधोबड रस्त्यावर दुचाकींची भीषण धडक; लग्नावरून परतणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू, २ गंभीर
अर्धापूर (जि. नांदेड): तामसा ते अर्धापूर रोडवरील लोणी गावाच्या पाटीजवळ गुरुवारी (७ मे) रात्री ११ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात घडला.
मुहूर्त साधून परतताना काळाचा घाला
लोणी येथील अजिंक्य देविदास चाटसे (वय २५) हा आपल्या मित्राच्या लग्नावरून दुचाकीने घराकडे परतत होता. त्याच वेळी तामसा येथील अभिषेक विश्वांभर नागठाणे (वय २५) हा अर्धापूरकडून तामसाकडे जात होता. लोणी पाटीजवळ या दोन्ही दुचाकींची जोरात धडक झाली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
स्थानिकांची मदत आणि संताप
अपघाताची माहिती मिळताच नरेंद्राचार्य संस्थानचे रुग्णवाहिका चालक राजू पाचंगे, १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. आनंद शिंदे आणि चालक मारोती गिरी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवले. या मार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाले असून, रस्ता ओबडधोबड असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.