लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्राने 'कनेक्टिव्हिटी' मध्येदेखील देशातील बहुतांश राज्यांना मागे सोडले आहे. राज्यात मोबाईल टॉवर्स उभारणीचा विक्रमी विस्तार झाला असून, मागील पाच वर्षांत साडेबावीस हजारांहून अधिक टॉवर्स लागले आहेत.
सद्यःस्थितीत राज्यातील एकूण टॉवर्सचा आकडा ९० हजारांहून अधिकवर पोहोचला असून, देशात ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च संख्या आहे, हे विशेष. कोरोना महामारीनंतर देशभरात डिजिटल सेवांचा वापर झपाट्याने वाढला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात इंटरनेट आणि मोबाइल कनेक्टिव्हिटीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये मोबाइल वापरकर्त्यांची संख्या वाढल्याने टेलिकॉम कंपन्यांनी या भागांकडे विशेष लक्ष देत टॉवर्स उभारण्याचा वेग वाढविला. ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये नेटवर्क पोहोचल्याने डिजिटल दरी कमी करण्यास मोठी मदत झाली आहे. ज्या गावांमध्ये पूर्वी मोबाइल सिग्नल मिळणेही कठीण होते, त्या ठिकाणी आता फोर जी आणि फाइव्ह जी सेवा सहज उपलब्ध होत आहेत.
एप्रिल २०२१ मध्ये राज्यात ६७हजार ६६९ मोबाइल टॉवर्स होते. यातील बहुतांश टॉवर्स शहरी भागांमध्ये होते. मात्र ग्रामीण व निमशहरी भागांत ग्राहकांमध्ये वाढ झाल्याने विविध मोबाइल कंपन्यांनी तेथेदेखील टॉवर उभारण्यास सुरुवात केली. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसपर्यंत महाराष्ट्रात मोबाइल टॉवर्सची संख्या ९० हजार ३५१ वर पोहोचली होती. पाच वर्षांत राज्यातील मोबाइल टॉवर्सच्या संख्येत ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
उभारलेले मोबाइल टॉवर्स
वर्ष नवीन टॉवस्
२०२१-२२ ७,७५१
२०२२-२३ ३,६३३
२०२३-२४ ४,१८०
२०२४-२५ २,९३७
२०२५-२६ ४,१८१
देशभरातील आघाडीची राज्ये
राज्य संख्या
उत्तर प्रदेश १,०४,५२१
महाराष्ट्र ९०,३५१
पश्चिम बंगाल ५३,९०२
गुजरात ५१,६६८
कर्नाटक ५१,५३४
उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचाच क्रमांक
देशात सर्वात जास्त मोबाइल टॉवर्स उत्तर प्रदेशमध्ये आहे. तेथील टॉवर्सची संख्या १ लाख ४ हजार ५२१ इतकी आहे. मात्र, त्या राज्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राहून बरेच जास्त आहे. मात्र क्षेत्रफळाच्या तुलनेत पाहता महाराष्ट्राची झेप अधिक महत्त्वाची मानली जात आहे.
पाच वर्षांत १२ हजार कोटींचा निधी
देशभरातील ग्रामीण भागातील 'कनेक्टिव्हिटी' वाढविण्यासाठी डिजिटल भारत निधीअंतर्गत विविध मोबाइल प्रकल्प राबविण्यात आले. २०२०-२१ पासून पाच आर्थिक वर्षांत या ग्रामीण व दुर्गम भागासाठी १२ हजार १२२ कोटींचा निधी वितरित करण्यात आला. या निधीतून महाराष्ट्रातील गडचिरोली, नंदुरबार, गोंदिया या जिल्ह्यांतदेखील मोठ्या प्रमाणावर मोबाइल टॉवर्स उभारण्यात आले.
Web Summary : Maharashtra leads in connectivity with a record mobile tower expansion. Over 22,000 new towers were installed in five years, reaching 90,000 total. Rural areas benefit from improved 4G/5G access due to Digital India funding, bridging the digital gap.
Web Summary : महाराष्ट्र कनेक्टिविटी में अग्रणी है, जहाँ मोबाइल टावरों का रिकॉर्ड विस्तार हुआ है। पाँच वर्षों में 22,000 से अधिक नए टावर स्थापित किए गए, जिससे कुल संख्या 90,000 तक पहुँच गई। डिजिटल इंडिया के वित्तपोषण से ग्रामीण क्षेत्रों में 4जी/5जी पहुंच बेहतर हुई है, जिससे डिजिटल विभाजन कम हो गया है।