प्रदूषित बोर नदीत उतरून आंदोलन; परिसरातील १५-२० गावांना बसतोय फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 15:32 IST2026-04-18T15:31:49+5:302026-04-18T15:32:15+5:30
Nagpur : परिसरातील बोर नदीतील पाण्याच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. निखिल पाटील यांनी नदीपात्रात बसून जाहीर निषेध नोंदवला.

Protest by entering polluted Bor river; 15-20 villages in the area are being affected
लोकमत न्यूज नेटवर्क
बाजारगाव : परिसरातील बोर नदीतील पाण्याच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. निखिल पाटील यांनी नदीपात्रात बसून जाहीर निषेध नोंदवला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय नागपूर यांनी ९ एप्रिल रोजी संबंधित उद्योगास पत्र देत नाल्यात साचलेल्या सांडपाण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, १ ते ८ एप्रिल रोजी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ भेट देऊन तपासणी केली. कारखान्याच्या परिसरामागील नाल्यात रंगीत सांडपाणी साचलेले आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर संबंधित उद्योगाने सांडपाण्याच्या विल्हेवाटीबाबत प्रस्ताव सादर केला. मंडळाकडून ते सांडपाणी अधिकृत वाहतूकदारामार्फत शास्त्रीय पद्धतीने सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) येथे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सांडपाण्याचे प्रमाण, वाहतूक करणाऱ्या टँकरची माहिती आणि सीईटीपीकडून नाकारण्यात आलेल्या सांडपाण्याची नोंद सादर करणे बंधनकारक असल्याचेही पत्रात नमूद आहे. यासोबतच, पर्यावरणात सांडपाणी सोडल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट इशाराही संबंधित उद्योगास देण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत झाली, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे सांगितले जात आहे.
यंत्रणेकडून कारवाई होणार का?
बोर नदीवर परिसरातील १५ ते २० गावे, मत्स्य व्यवसाय करणारे शेतकरी, नागरिक, तसेच जनावरे आणि वन्यजीव मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य वाढले आहे. पुढील काळात संबंधित यंत्रणेकडून काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"पाणी रसायनयुक्त असल्याचा संशय व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणांकडून तपासणी व सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र त्या सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत झाली याबाबत स्पष्टता दिसत नाही. त्यामुळे आम्ही नदीत उतरून जाहीर निषेध नोंदवला आहे. प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी."
- निखिल पाटील, आंदोलक