अमृता फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य, नागपुरात भाजपचा आक्रमक पवित्रा
By योगेश पांडे | Updated: January 27, 2026 21:54 IST2026-01-27T21:53:18+5:302026-01-27T21:54:29+5:30
पोलीस आयुक्तांकडे तक्रार : गायिका अंजली भारतीविरोधात कठोर कारवाईची मागणी

अमृता फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य, नागपुरात भाजपचा आक्रमक पवित्रा
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्याबाबत गायिका अंजली भारतीने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपच्या महिला आघाडीतर्फे पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांची भेट देत तक्रार देण्यात आली. अंजली भारतीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
डारा येथील एका कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी एका जाहीर कार्यक्रमात अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे. सार्वजनिक व्यासपीठावरून एका महिलेबद्दल अशा प्रकारचे असभ्य वक्तव्य करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखणे गरजेचे आहे. संबंधित गायिकेवर कारवाई झाली नाही तर शहरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महिला मोर्चा अध्यक्ष दिव्या धुरडे यांनी दिला. यावेळी नगरसेवक श्रीकांत आगलावे, अश्विनी जिचकार, मनिषा अतकरे, महामंत्री रितेश गावंडे, भाजयुमो अध्यक्ष सचिन करारेप्रशंसा भोयर,सीमा ढोमने,मोहिनी रामटेके,मधुर भांडारकर प्रामुख्याने उपस्थित होते.