आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 11:30 IST2026-04-15T11:28:14+5:302026-04-15T11:30:19+5:30
Sanjay Raut News: महापालिका निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरेंनी उत्तम काम केले आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
Sanjay Raut News: महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. जून महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांना मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर केला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर संजय राऊत यांनी दिलेल्या उत्तराने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.
पत्रकारांशी संवाद साधत असलेल्या संजय राऊत यांना राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांबाबत प्रश्न विचारण्यात आला. आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर फिरत नाहीत, त्यामुळे इतर कोणाला कार्याध्यक्ष केल्यास ते महाराष्ट्रभर फिरतील तरी असे तुमचेच खासदार खासगीत बोलतात, असे पत्रकारांना सांगितले. यावर बोलताना, मला मीडियातून माहिती समजली. हे जे निर्णय असतात ते पक्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात. उद्धव ठाकरे कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. आदित्य ठाकरे यांचे नाव समोर आले असेल तर स्वागत केले पाहिजे. मीडियातील माहितीवर हे बोलत आहे. अजून तरी असे काही ठरलेले नाही, असे संजय राऊतांनी नमूद केले.
आदित्य ठाकरेंनी उत्तम काम केले, पुढचे राजकारण तरुणाच्या हातात गेले पाहिजे
तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. पुढचे राजकारण तरुणाच्या हातात गेले पाहिजे. खासगीमध्ये बोलण्याला अर्थ नसतो. पक्षाच्या संघटनेत चर्चा होत असते. मुंबई महापालिका किंवा इतर महापालिकांच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी उत्तम काम केले आहे. त्यांच्या तरुणांच्या टीमने उत्तम काम केले आहे, असे संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, ठाकरे गटाची महत्त्वाची कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला जाईल आणि तो मंजूर केला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच निष्ठावंत युवा कार्यकर्त्यांना अधिक संधी मिळू शकते. संघटनेत फेरबदल केले जाऊ शकतात. संघटना अधिक बळकट करण्यासाठी बूथ स्तरावर आणि जिल्हा स्तरावर काही मोठे फेरबदल होतील, असेही म्हटले जात आहे.