मिनी मंत्रालयांवर कोणाची येणार सत्ता? आज फैसला; ZP निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 06:03 IST2026-02-09T06:02:38+5:302026-02-09T06:03:02+5:30
निकालांकडे सत्ताधारी आणि विरोधकांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी

मिनी मंत्रालयांवर कोणाची येणार सत्ता? आज फैसला; ZP निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
मुंबई - राज्यातील १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडल्यानंतर सोमवारी या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून या निकालांकडे सत्ताधारी आणि विरोधकांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी २६२४ उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या १४६२ जागांसाठी ४८१४ उमेदवार नशिब आजमावत आहेत. या निवडणुकीत ६८.२८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान परभणी जिल्ह्यात ७४.८९ टक्के झाले, तर सर्वात कमी मतदान रत्नागिरीत ५५.७९ टक्के इतके झाले. ग्रामीण भागात विकासकामे, पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य आणि रोजगार हे प्रमुख मुद्दे ठरले, तर राजकीय आघाड्यांमुळे निवडणुकांवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण
मतमोजणीसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली असून, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर केले जाणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
२० जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे भवितव्य अजूनही अधांतरी
ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त गेली आहे त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी प्रलंबित आहे. गेल्या महिन्यात निकाल येणे अपेक्षित होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाची प्रतीक्षा आहे. काही दिवसात याचा निकाल आला तरी वार्षिक परीक्षांचा कालावधी लक्षात घेता या निवडणुका लवकर होण्याची शक्यता नाही.