Vidhan sabha 2019 : उद्धव 'वर्षा'वर गेले अन् युतीचा मार्ग मोकळा झाला; फिफ्टी-फिफ्टी गुंडाळला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 05:30 AM2019-10-02T05:30:49+5:302019-10-02T09:19:46+5:30

लोकसभा निवडणुकीचा युतीचा फॉर्म्युला जाहीर करताना विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष फिप्टी-फिप्टी जागा (प्रत्येकी १४४) लढतील, असे भाजप व शिवसेनेच्याही शीर्षस्थ नेत्यांनी जाहीर केले होते. तथापि...

Vidhan sabha 2019: BJP-164 & Shiv Sena-124 Contest in Maharashtra Assembly Election | Vidhan sabha 2019 : उद्धव 'वर्षा'वर गेले अन् युतीचा मार्ग मोकळा झाला; फिफ्टी-फिफ्टी गुंडाळला!

Vidhan sabha 2019 : उद्धव 'वर्षा'वर गेले अन् युतीचा मार्ग मोकळा झाला; फिफ्टी-फिफ्टी गुंडाळला!

Next

- यदु जोशी 
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा युतीचा फॉर्म्युला जाहीर करताना विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष फिप्टी-फिप्टी जागा (प्रत्येकी १४४) लढतील, असे भाजप व शिवसेनेच्याही शीर्षस्थ नेत्यांनी जाहीर केले होते. तथापि, आता भाजपच्या वाट्याला १६४ जागा आल्या असून शिवसेना १२४ जागा लढेल. भाजप आपल्या कोट्यातून लहान मित्र पक्षांना जागा देईल. शिवसेनेला झुकवण्यात भाजपला यश आल्याचे त्यावरून स्पष्ट होते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्र परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा (भाजप २५, शिवसेना २३) फॉर्म्युला मुंबईत पत्र परिषदेत जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी विधानसभेत दोन्ही पक्ष समसमान जागा लढतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात शिवसेनेला १२४ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. याचा अर्थ २० जागा त्यांना सोडाव्या लागल्या.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे भाजप आता राज्यात स्वबळावरच लढणार, असे चित्र निर्माण झाले होते. तथापि, मुख्यमंत्री फडणवीस हे सुरुवातीपासून युतीबाबत आग्रही होते. २०१४ मध्ये भाजपने १२२ तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या आणि युतीमध्ये आपणच मोठा भाऊ असल्याचे भाजपने सिद्ध केले. यावेळच्या जागावाटपानेही तेच अधोरेखित केले आहे. भाजप आपल्या वाट्याला आलेल्या १६४ पैकी रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना या लहान पक्षांना दहाएक जागा देईल, अशी शक्यता आहे.
अलिकडे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री गणेश नाईक यांना मंदा म्हात्रे यांच्या जागी बेलापूरमध्ये उमेदवारी हवी होती. शिवसेनेने या जागेवर हक्क सांगितला. नाईक नकोतच अशी भूमिकाही घेतली. शेवटी जागा भाजपकडेच ठेवायची आणि तिथे नाईक यांच्याऐवजी विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच संधी द्यायची असा तोडगा काढण्यात आला. ठाण्याची जागा भाजपने शिवसेनेला दिली नाही.

उद्धव ‘वर्षा’वर गेले अन् युतीचा मार्ग मोकळा

शिवसेनेने १२६ जागांचा आग्रह धरला आणि भाजप १२० पेक्षा एकही जागा जास्त द्यायला तयार नव्हता. तसेच तीनचार जागांबाबत आणि उमेदवारांबाबतही वाद होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काल रात्री १२ च्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले. रात्री अडीचपर्यंत बसून दोघांनी वादाचे विषय निकाली काढले.

Web Title: Vidhan sabha 2019: BJP-164 & Shiv Sena-124 Contest in Maharashtra Assembly Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.