पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 23:33 IST2026-04-26T23:30:55+5:302026-04-26T23:33:47+5:30
सध्या होर्मुज सामुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर इराणने कब्जा करून ठेवला आहे. यामुळे या मार्गाने होणारा इंधन पुरवठा कमी झाला आहे. परिणामी इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
पाकिस्तान सध्या भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा थेट परिणाम तेथील अर्थव्यवस्थेवर होत आहे. या युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी तेल आणि गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. 'द न्यूज इंटरनॅशनल'ने दिलेल्या वृत्तानुसार, शहबाज शरीफ सरकार हा तणाव कमी करण्यासाठी कुटनीतिक प्रयत्न करत आहे, मात्र त्यांना अद्याप कोणतेही ठोस यश मिळाल्याचे दिसत नाही.
सध्या होर्मुज सामुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर इराणने कब्जा करून ठेवला आहे. यामुळे या मार्गाने होणारा इंधन पुरवठा कमी झाला आहे. परिणामी इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आयातीवर अवलंबून असलेल्या पाकिस्तानात तर इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. देशाच्या अनेक भागांत वीज कपात आणि गॅस टंचाईच्या तक्रारी वाढल्या आहेत. याचा मोठा फटका जनतेच्या खिशाला बसताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या इंधन समायोजन शुल्कापोटी वीज नियामक प्रति युनिट १.४२ रुपये अतिरिक्त वसुलीच्या तयारीत आहे.
२०० अब्ज रुपयांचा फटका -
तज्ज्ञांच्या मते, जर हे संकट आणखी काही दिवस चालूच राहिले तर जनतेवरील आर्थिक बोजा आणखी वाढेल. सरकारने ऊर्जा बचतीसाठी दुकाने लवकर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र यावरून आता वाद सुरू झाला आहे. 'चेनस्टोर असोसिएशन ऑफ पाकिस्तान'नुसार, दुकाने लवकर बंद करण्याच्या शाहबाज सरकारच्या निर्णयाने केवळ दोन आठवड्यांतच पाकिस्तानला सुमारे २०० अब्ज रुपयांच्या फटका बसला आहे. व्यवसायाचे नुकसान झाले आहे.
याचा सर्वाधिक फटका संघटित रिटेल क्षेत्राला बसत आहे. छोट्या बाजारपेठांवर मात्र फारसा परिणाम झालेला नाही. मात्र, एकूणच पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत चिंताजनक बनली आहे.