शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 21:55 IST2026-04-26T21:53:23+5:302026-04-26T21:55:39+5:30
रेशीमबाग येथील मैदानावर रविवारपासून बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र शास्त्री यांची रामकथा आयोजित करण्यात आली. रामकथेपूर्वी धीरेंद्र शास्त्री महाराजांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हिंदुत्वाचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांनाच आहे...

शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
नागपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू राष्ट्राचा संकल्प करून हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी दाखविलेल्या वाटेवर वाटचाल सुरु असून त्यांच्या विचारधारेला माझे जीवन समर्पित केले आहे. परंतु माझ्या बोलण्याचा विपर्यास करून सोशल मिडियावर चुकीचे वक्तव्य मांडण्यात आले. त्यामुळे कुणाची मने दुखावली गेली असल्यास मी माफी मागतो, असे म्हणून माध्यमांवर खापर फोडत बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकार परिषदेत माफी मागितली.
रेशीमबाग येथील मैदानावर रविवारपासून बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र शास्त्री यांची रामकथा आयोजित करण्यात आली. रामकथेपूर्वी धीरेंद्र शास्त्री महाराजांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हिंदुत्वाचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांनाच आहे. संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघाची लोक आपलीच आहेत. आम्ही आपसात भांडलो तर इतरांना संधी मिळेल. शिवाजी महाराजांना संत-महंत, गुरुप्रती किती आदर होता, हे सांगण्याचा प्रयत्न मी दोन दिवसांपूर्वी केला. परंतु प्रसार माध्यमांनी ते चुकीच्या पद्धतीने मांडले. शिवाजी महाराजांबद्दल स्वप्नातही कोणी अपशब्द काढल्यास मी ते सहन करू शकत नाही. हिंदुत्वाच्या प्रसारासाठी लवकरच रथयात्रा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, भारतात, महाराष्ट्रात लव्ह जिहादचे प्रमाण वाढले आहे. सोशल मिडियावर चांगले दिसून चांगले बोलून हिंदु मुलींना जाळ्यात ओढल्यानंतर त्यांच्यावर आपला धर्म लादला जात आहे.
मध्यप्रदेशात मागील वर्षी लव्ह जिहादची २८० प्रकरणे घडली. प्रेम करणे चुकीचे नाही. पण संस्कृतीचे हनन योग्य नाही. त्यासाठी हिंदु धर्मविरोधी ताकदींना वेळीच पायबंद घालण्याची गरज असून त्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या आव्हानाबाबत ते म्हणाले, आम्हाला कोणालाही प्रमाण देण्याची गरज नाही. आम्ही स्व:तशी जोडण्यासाठी नव्हे तर हनुमानाशी जोडण्यासाठी भाविकांना दरबारात बोलावतो. परंतु संतांना तुच्छ लेखण्याचा प्रयत्न काहीजण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘बुरखाधारी’ बनु नका, मुलांची अट हिंदुंनाच का? -
धीरेंद्र शास्त्री महाराज म्हणाले, हिंदु मुलींनी सोशल मिडियावर रिल पाहताना आपण ‘रियल’ कोण आहोत याचे भान ठेवण्याची गरज आहे. तुम्ही सैन्यात जा, डॉक्टर बना, दुर्गा किंवा काली बना. परंतू बुरखाधारी कधीही बनु नका. चार मुले करून त्यातील एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या या वक्तव्याबाबत माझ्यावर टीका करण्यात येत आहे. परंतु लोकसंख्या नियंत्रण कायद्यात केवळ दोनच मुले जन्माला घालावीत, अशी अट आहे. ही अट हिंदुनाच का आहे. ‘चच्चे’ला ३० मुले झाली तरी चालतात मग हिंदुंना का नाही. मी विवाह बंधनात अडकल्यानंतर माझीही मुले देशासाठी देईन, असे त्यांनी सांगितले.