राजकीय संस्कृतीच बदलून टाकण्याचा प्रयत्न, राज ठाकरे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 08:34 IST2026-04-18T08:33:36+5:302026-04-18T08:34:30+5:30
Mumbai News: भाजप गेली दहा वर्ष पक्ष फोडत होता. आमदार, खासदार फोडत होता. राजकीय घरांमध्ये फूट पाडत होता. जाती-धर्माच्या नावाखाली माथी भडकवत होता. पण आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

राजकीय संस्कृतीच बदलून टाकण्याचा प्रयत्न, राज ठाकरे यांचा आरोप
मुंबई - भाजप गेली दहा वर्ष पक्ष फोडत होता. आमदार, खासदार फोडत होता. राजकीय घरांमध्ये फूट पाडत होता. जाती-धर्माच्या नावाखाली माथी भडकवत होता. पण आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. महिला आरक्षणाला पक्षाचा पाठिंबा आहे. परंतु, त्याची ढाल करत लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेचा डाव खेळून उत्तरेचे महत्त्व वाढविण्याच्या प्रयत्नाला स्पष्ट विरोध आहे.
देशाची राजकीय संस्कृतीच बदलून टाकण्याचा हा प्रयत्न असून, याविरोधात आंदोलन उभारू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. राज ठाकरे यांनी शुक्रवारी एक पत्र पोस्ट करत महिला आरक्षण व लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबद्दलची भूमिका स्पष्ट केली.
उत्तरेतील राज्यांचा संसदेतील टक्का वाढविण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र, गोवा व दक्षिणेतील राज्यांची स्वतःची संस्कृती आहे. भाषा, लिपी आहे. हिंदी सक्तीच्या नावाखाली सरकारने काय केले ते पाहिले. वाढलेल्या खासदारांच्या जोरावर देशाच्या हिंदीकरणाची भीती असल्याने दक्षिणेतील राज्ये एकवटली आहेत. उत्तरेच्या ३, ४ राज्यांतील लोकांनी अन्य राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. शिक्षण, आरोग्य, महिलांचे सक्षमीकरण करून लोकसंख्या नियंत्रणात ठेवणाऱ्या राज्यांना बर्बाद करणाऱ्या उत्तरेतील राज्यांचा संसदेतील टक्का वाढविण्याचा हा अजब न्याय कुठला, असा परखड सवालही राज यांनी पत्रातून केला आहे.