गतवैभव मिळवण्यासाठी ‘महाराष्ट्र नेक्स्ट’मध्ये सहभागी व्हा, प्रतिमांचे नको प्रतिभांचे पूजन करा - मनसे अध्यक्ष राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 07:02 IST2026-03-20T07:01:12+5:302026-03-20T07:02:01+5:30
आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे. सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही यासाठी नवी योजना आणली आहे. महाराष्ट्र नेक्स्ट नाव असलेली वेबसाईट आजपासून महाराष्ट्राला अर्पण करत आहे.

गतवैभव मिळवण्यासाठी ‘महाराष्ट्र नेक्स्ट’मध्ये सहभागी व्हा, प्रतिमांचे नको प्रतिभांचे पूजन करा - मनसे अध्यक्ष राज ठाकरे
मुंबई : आपल्या देशात बाहेरून येणाऱ्या तेल, गॅसचे तुणतुणे वाजवले जाते. पण, जगात दुबईसारख्या अनेक देशांनी बाहेरचे मेंदू आणून त्यांच्या देशाचा विकास केला. महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीला चांगले जीवन देण्यासाठी बाहेरचे पैसे नको तर चांगले मेंदू हवे आहेत. महाराष्ट्रात सध्या प्रतिमांचे पूजन होत असून पूर्वीचे गतवैभव प्राप्त होण्यासाठी चांगल्या प्रतिभांचे पूजन आवश्यक आहे. त्याचीच सुरुवात म्हणून आपण महाराष्ट्र नेक्स्ट ही वेबसाईट सुरू करत असून त्यात तुम्ही तुमच्या राज्य घडवण्याच्या कल्पनेसह सहभागी व्हा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
दादरच्या शिवाजी पार्क मैदानात मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. लोकांनी प्रश्न विचारू नये, रस्त्यावर येऊ नये यासाठी त्यांना सातत्याने करमणुकीत गुंतवून ठेवले जात आहे. त्यासाठी चित्रपट, आयपीएल, इन्स्टाग्राम सारख्या अनेक माध्यमांचा वापर केला जात आहे. आधी इन्स्टाग्रामधून बाहेर पडा आणि करमणुकीच्या गटारगंगेत वाहून जाऊ नका. राज्यावर ११ लाख कोटींचे कर्ज असताना मुख्यमंत्री तीन ट्रिलियन इकॉनॉमी करणार असे सांगतात. राज्यात तीन वेळा कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्याही राज्यात होतात हे दुर्दैवी आहे.
महाराष्ट्र नेक्स्ट वेबसाईट राज्याला अर्पण
आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे. सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही यासाठी नवी योजना आणली आहे. महाराष्ट्र नेक्स्ट नाव असलेली वेबसाईट आजपासून महाराष्ट्राला अर्पण करत आहे.
वेबसाईटमध्ये शेती, आरोग्य व्यवस्था, वाहतूक सुविधा असे २७ विविध विषय आहेत. महाराष्ट्रासाठीच्या नव्या कल्पना, विचार या वेबसाईटवर टाकता येतील. त्या तज्ज्ञांकडून तपासून पाहून पुढे सरकारकडे पाठवू. जनता व सरकारमध्ये नव्या विचारांचे वाहक म्हणून मनसे काम करेल असेही राज ठाकरे म्हणाले.
चूक केली... भारत संकटात सापडणार
सध्या परिस्थिती भीषण आहे. अन्न शिजवायला गॅस नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काही गोष्टी राहून गेल्या. इतकी वर्ष साथ देणाऱ्या इराणवर हल्ले होत असताना त्याला साथ द्यायला हवी होती. खामेनी गेल्यानंतर निषेधाचे, हल्ल्यावरही निवेदन काढले नाही. इराणला पाठिंबा न देऊन मोठी चूक केली असून त्याचे परिणाम भविष्यात पाहायला मिळणार आहेत, असा इशारा राज यांनी दिला.
महापुरुषांना जातीत विभागू नका
भाषणादरम्यान त्यांनी महाराष्ट्रासाठी योगदान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अलीकडील महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांची यादी वाचवून दाखवली. आपल्याकडे या महान लोकांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. पण, त्यांचे विचार घेतले जात नाहीत. त्यांची जात वेगवेगळी असली तरी आधुनिक महाराष्ट्राच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे अशा महापुरुषांना जातीत विभागू नका, असे आवाहन राज यांनी केले.