Mumbai Pune Expressway: तब्बल २२ तास झाले तरी एक्स्प्रेस वे 'जॅम'; प्रवासी बेहाल, खायचे-प्यायचेही हाल, प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:00 IST2026-02-04T15:59:59+5:302026-02-04T16:00:54+5:30
Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक २२ तासानंतरही खोळंबली आहे. या वाहतुक कोंडीमुळे अनेक प्रवासी बेहाल झाले आहेत.

Mumbai Pune Expressway: तब्बल २२ तास झाले तरी एक्स्प्रेस वे 'जॅम'; प्रवासी बेहाल, खायचे-प्यायचेही हाल, प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा
पुणे - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मंगळवारी घाटात टँकर उलटल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली. जवळपास २२ तास झाले तरीही अद्याप मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी सुटली नाही. अजूनही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेसह जुना मुंबई-पुणे हायवेही जॅम झाला आहे. गॅस टँकर रस्त्यावर पलटी झाला आणि गॅस गळती होत असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक २२ तासानंतरही खोळंबली आहे. या वाहतुक कोंडीमुळे अनेक प्रवासी बेहाल झाले आहेत. वाहतुक कोंडीमुळे काही प्रवाशांना व्यवसायाच्या बैठकीसाठी जायचे होते. मात्र कोंडीमुळे त्यांना इच्छित स्थळी पोहचता येत नाही. काही प्रवासी वाहने मुंबईच्या दिशेने येत आहेत त्यांनाही कोंडीचा सामना करावा लागत आहे. सकाळी ७ वाजता एक टेम्पो चालक या कोंडीत फसला. त्याने प्रशासनावर आरोप करत कुणीही वाहतूक कोंडीची पूर्वकल्पना दिली नसल्याचा आरोप केला. खंडाळा घाटातील बोगद्याजवळ हा गॅस टँकर पलटी झाला. त्यातून होणाऱ्या गॅस गळतीमुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या वाहतूक कोंडीत लातूरहून मुंबईच्या दिशेने एक प्रवासी अडकले आहे. हे प्रवासी एका कॅन्सरग्रस्त रुग्णाला घेऊन मुंबईच्या टाटा रुग्णालयात उपचारासाठी येत होते. सकाळी ८ वाजता त्यांना रुग्णालयात पोहचायचे या हेतूने रात्री १० वाजता ते लातूरहून निघाले. मात्र ४ वाजल्यापासून ते वाहतूक कोंडीत अडकले आहेत. दुसरे प्रवासी रात्री ३ वाजल्यापासून या वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यांचा विमान प्रवास होता मात्र या कोंडीमुळे त्यांचा विमान प्रवास रद्द करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने एका बाजूची वाहतूक सुरू ठेवायला हवी होती असं संतप्त प्रवासी म्हणत होते. मात्र २०-२२ तासांपासून वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचे आता खायचे-प्यायचे हाल झाले आहेत.
दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. तेव्हापासून पहाटे ४ वाजेपर्यंत टँकरमधील गॅस गळती थांबवण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र त्याला यश आले नाही. त्यानंतर सकाळी पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू झाले. मात्र या प्रयत्नाला यश कधी मिळेल हे सांगणे कठीण आहे. ज्या यंत्रणा आहेत त्यांनाही कोंडीमुळे घटनास्थळी पोहचणे कठीण होत आहे. एनडीआरएफ टीम इथे पोहचलीय, टाटाची टीम आहे. केमिकल तज्ज्ञ इथे पोहचले अशी माहिती हेल्प फाऊंडेशन रेस्क्यू टीमचे गुरुनाथ साठेलकर यांनी माध्यमांना दिली.
एक्सप्रेस वे चा प्रवास टाळा
गॅस टँकर पलटल्याने त्यातून गॅस लिकेजचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद केली आहे. पुण्याकडे जाणारी वाहतूकही खालापूर टोलनाक्यापर्यंत कोंडी झाली आहे. त्यामुळे गॅस लिकेजचे प्रमाण कमी होऊन ते पूर्णपणे संपेपर्यंत आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. रेस्क्यू टीमकडून इथे काम सुरू आहे. परंतु पूर्णपणे वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी काही तास लागतील. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ताम्हिणी घाटमार्गे कर्जत, रायगड प्रवास करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्याशिवाय माळशेज घाट, आळेफाटा - ठाणे अशीही वाहतूक करण्यास सांगितले जात आहे अशी माहिती महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली.