'महाराष्ट्रात व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद'चा मेसेज; राज्य सरकारचा 'त्या' पोस्टवर खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:22 IST2026-03-11T15:19:19+5:302026-03-11T15:22:50+5:30
इराण आणि इस्रायल-अमेरिका युद्धामुळे गॅस पुरवठा खंडित झाला असून, त्याचे परिणाम भारतात दिसू लागले आहेत. अशातच एक मेसेज व्हायरल होत असून, महाराष्ट्र सरकारने त्याबद्दल खुलासा केला आहे.

'महाराष्ट्रात व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद'चा मेसेज; राज्य सरकारचा 'त्या' पोस्टवर खुलासा
अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात सुरु केलेल्या युद्धामुळे आखाती देशातून होणार गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. संभाव्य गॅस टंचाई टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात असून, व्यावसायिक वापराच्या गॅसबद्दल काही निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात व्यावसायिक एलपीजी गॅसचा पुरवठा बंद करण्यात आल्याचा मेसेज पसरवला जात आहे. त्यावर ही माहिती दिशाभूल करणार असल्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे.
मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात गॅस टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात लोक आता गॅस सिलेंडरसाठी रांगा लावत असल्याचे दृश्ये दिसू लागली आहेत. महाराष्ट्रातही अनेक भागात व्यावसायिकांकडून चुलीचा वापर सुरू झाला आहे.
व्यावसायिक गॅस पुरवठा बंद?
सोशल मीडियावर महाराष्ट्रात व्यावसायिक वापराचा गॅस पुरवठा बंद करण्यात आल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होत आहे.
राज्य सरकारच्या माहिती खात्याने याबद्दल म्हटले आहे की, 'महाराष्ट्रात व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले दावे दिशाभूल करणारे आहेत. घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत.'
महाराष्ट्रात व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले दावे दिशाभूल करणारे आहेत.#FactCheck#DGIPRFactCheck
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 10, 2026
घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. भू-राजकीय परिस्थिती आणि केंद्र सरकारचे… pic.twitter.com/d21FAD2B7l
'भू-राजकीय परिस्थिती आणि केंद्र सरकारचे निर्देश यांच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यासंदर्भातील प्राधान्यक्रमात तात्पुरता बदल होऊ शकतो. मात्र, व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे', असा खुलासा महाराष्ट्र सरकारच्या माहिती विभागाने केला आहे.
भारतात तेल आणि गॅस दुसऱ्या देशांतून आयात केला जातो. या दोन्ही इंधनाबद्दल भारत जास्त आयातीवर अवलंबून आहे. त्यातही मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅस हा आखाती देशातून येतो. इराण युद्धामुळे होर्मुझ स्ट्रेट सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
या सामुद्रधुनी तेल, गॅसच्या होणाऱ्या एकूण पुरवठ्यापैकी भारतात ८० टक्के पुरवठा होता. मात्र, हवाई हल्ले आणि इराणने जहाजांवर हल्ले करण्याचा इशारा दिल्याने ही वाहतूक जवळपास ठप्पच झाली आहे. त्यामुळे भारतात गॅस टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.