मोठा ट्विस्ट! नवा ‘बार्शी पॅटर्न’, कट्टर विरोधक दोन्ही शिवसेना एकत्र; सुषमाताई म्हणाल्या, “भाजपाविरोधात…”
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 15:46 IST2026-01-25T15:41:59+5:302026-01-25T15:46:11+5:30
Sushma Andhare On Barshi Shiv Sena Alliance News: जो भाजपाला हरवण्यासाठी लढत आहेत, त्यांच्यासोबत आम्ही लढत आहोत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

मोठा ट्विस्ट! नवा ‘बार्शी पॅटर्न’, कट्टर विरोधक दोन्ही शिवसेना एकत्र; सुषमाताई म्हणाल्या, “भाजपाविरोधात…”
Sushma Andhare On Barshi Shiv Sena Alliance News:भाजपा हा काही धुतल्या तांदळाचा पक्ष नाही, फक्त त्यांच्याकडे पैसा खूप झाला आहे. मनी-मसल त्यांच्याकडे जास्त आहे. त्यांचा सामना करण्यासाठी मेंटल पॉवर आमच्याकडे जास्त आहेत. मी अत्यंत साधी आणि चळवळीतील कार्यकर्ता आहे, मी महिला असल्याचे विक्टिम कार्ड कधी खेळत नाही. सोबत काम करणाऱ्यांना माझे सांगणे आहे की, मला बाई समजून हलक्यात घेऊ नये. शिवसेनेत पाहिल्यांदा एका महिलेले जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून पद दिले आहे. आम्ही एकटे लढत आहोत. जो भाजपाला हरवण्यासाठी लढत आहेत, त्यांच्या सोबत आम्ही लढत आहोत, असे विधान उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे.
आताच्या घडीला राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीत कोणता पक्ष कोणासोबत कधी युती करेल किंवा कोणता नेता कधी कोणत्या पक्षात जाईल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येत असते. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या दोन्ही शिवसेनेला एकत्र आणण्याचे काम बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी केल्याचे म्हटले जात आहे. येथील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाविरुद्ध दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढवत असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयाने राज्यभरातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी स्पष्टीकरण दिले.
बार्शीचा निर्णय हा पक्षाचा निर्णय नाही
बार्शीचा निर्णय हा पक्षाचा निर्णय नसून तेथील आमदारांनी त्यांच्या सदसद्वविवेकाला स्मरुण घेतलेला आहे. हा पक्ष संघटनेचा निर्णय नाही. पक्षप्रमुखांनी मला सांगितले आहे की, ते स्वत: आमदारांशी बोलणार आहेत. बार्शीला आमदार आहेत, तिथे जर माझी गरज वाटली तर पक्षप्रमुखांना बोलून मी ठरवेन, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीला सन्माननीय पक्षप्रमुखांनी षण्मुखानंद हॉल येथून स्पष्टपणे सांगितले आहे की, जीव गेला तरी बेहत्तर, पण मी अशा दोघांचा गुलाम होणार नाही. हे वाक्य आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. या वाक्याला प्रमाण मानून आम्ही काम करत आहोत. नगर परिषेदला काय झाले, महापालिकेला काय झाले, तेव्हा मी नव्हते. जिल्हा परिषद निवडणुकीत फॉर्म भरणे, युती-आघाडी यात मी नव्हते. इथून पुढे कसे लढायचे ते माझ्या हातात आहे. परंतु, बार्शीची युती ही आमची युती नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जे लोक भाजपत गेले त्यांच्यावर कारवाईचा प्रश्न काय? दिल्या घरी सुखी राहा असे म्हणायचे. उद्धव ठाकरे बागेश्वर बाबा नाहीत, एकचवेळी चार ठिकाणी दिसायला. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी प्रतिनिधी नेमलेले आहेत, ते त्यांची जबाबदारी पार पडत आहेत. जर त्यांनी जबाबदारी पार पाडली नाही, तर त्यांच्यावर काय निर्णय घ्यायचे, त्याची सुरुवात मी आतापासून करेन, असा इशाराही सुषमा अंधारे यांनी दिला.