मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 13:46 IST2026-05-17T13:45:28+5:302026-05-17T13:46:12+5:30
मंदिराच्या पायऱ्यांवर बसून हा एक श्लोक म्हणा, देवाच्या चरणी थेट पोहोचेल प्रार्थना; काय सांगते सनातन परंपरा? जाणून घ्या...

मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
अनेक जण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर, मंदिराच्या पायऱ्यांवर बसत असतात. खरेतर, मंदिरात देवाचे दर्शन घेतल्यानंतर काही वेळ पायऱ्यांवर बसणे आणि नंतरच घरी जाणे, ही जुनी परंपरा आहे. मात्र, मंदिराच्या पायऱ्यांवर बसणे शुभ असते की अशुभ आणि यामागचे नेमके रहस्य काय? यासंदर्भात फार कमी लोकांना माहिती असते. तर जाणून घेऊयात.
सनातन धर्मात एक मान्यता आहे की, मंदिराची रचना ही 'देव विग्रहा'प्रमाणे (देवाचे रूप) असते. यामध्ये मंदिराचे शिखर हे देवाचे मुख आणि मंदिराच्या पायऱ्या या देवाच्या चरणपादुका मानल्या जातात. यामुळेच, शिखराचे दर्शन घेताना डोळे उघडे ठेवून ध्यान केले जाते, तर पायऱ्यांवर बसून डोळे मिटून देवाचे स्मरण केले जाते.
लवकर पूर्ण होतात मनातील इच्छा... मनोकामना... -
मंदिराच्या पायऱ्या या देवाच्या चरणांसारख्या असतात. त्यामुळे तेथे डोळे मिटून प्रार्थना केल्यास देव ती लवकर ऐकतात आणि इच्छा पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. याशिवाय, मंदिराच्या शिखराचे दर्शन घेतल्याने देवाच्या प्रत्यक्ष दर्शनाइतकेच पुण्य मिळते आणि जीवनातील कष्ट दूर होऊन मानसिक शांतता लाभते. त्यामुळे दर्शनानंतर शिखराचे दर्शन घेऊन पायऱ्यांवर बसावे आणि कळत-नकळत झालेल्या चुकांसाठी देवाची क्षमा मागावी.
यावेळी सोबत दिलेला श्लोक म्हणणे अत्यंत फलदायी मानले जाते -
अनायासेन मरणम्, बिना देन्येन जीवनम्।
देहान्त तव सानिध्यम्, देहि मे परमेश्वरम् ।।
अर्थ - हे प्रभू! मला कोणतीही वेदना किंवा आजार न होता चालता-फिरता मरण यावे, माझे जीवन लाचारीचे नसावे आणि मृत्यूसमयी तू माझ्यासमोर असावास, असा आशीर्वाद मला दे.
पायऱ्यांवर बसणे केव्हा ठरते अशुभ? -
जर एखादी व्यक्ती मंदिराच्या पायऱ्यांवर बसून प्रापंचिक गोष्टी, घर, व्यवसाय अथवा राजकारणाच्या गप्पा मारत असेल, अथवा कोणाची निंदा-नालस्ती करत असेल, तर त्याचेच अहित होऊ शकते. यामुळे मंदिर परिसरात अथवा पायऱ्यांवर बसून अशा इतर वाईट गप्पा गोष्टी करण्यापेक्षा परमेश्वराचेच ध्यान करायला हवे.