अजित पवारांसोबत विमानात नेमके कोण होते? अपघातातून कोणालाही वाचवता आले नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 10:12 IST2026-01-28T10:12:40+5:302026-01-28T10:12:40+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये भीषण अपघात झाला.

अजित पवारांसोबत विमानात नेमके कोण होते? अपघातातून कोणालाही वाचवता आले नाही
Ajit Pawar Plane Crash: राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या अन्य पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीच्या दौऱ्यावर होते. आज दिवसभरात त्यांच्या चार भव्य सभांचे आयोजन करण्यात आले होते. या नियोजित दौऱ्यासाठी ते सकाळी विमानाने बारामतीला पोहोचले. मात्र, विमानतळावर उतरत असताना लँडिंग दरम्यान हा भीषण अपघात झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान धावपट्टीवर उतरत असतानाच ही दुर्घटना घडली. विमान कोसळताच त्याने पेट घेतल्याने ते संपूर्ण जळून खाक झाले.
#UPDATE | Crash landing in Baramati | Ajit Pawar, Deputy CM of Maharashtra, was onboard along with 2 more personnel (1 PSO and 1 attendant) and 2 crew (PIC+FO) members. As per initial information, no person on board has survived the crash: DGCA (Directorate General of Civil… pic.twitter.com/M8yEunTpyB
— ANI (@ANI) January 28, 2026
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानेदिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बारामती येथे झालेल्या विमानाचा अपघात अत्यंत भीषण होता. या विमानात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण ५ व्यक्ती होत्या. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे एक पी.एस.ओ. आणि एक सहाय्यक प्रवास करत होते. विमानाचे नियंत्रण करण्यासाठी दोन क्रू मेंबर्स, ज्यात मुख्य पायलट आणि सह-पायलट यांचा समावेश होता. डीजीसीएने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण क्रॅश लँडिंगमध्ये विमानातील कोणीही वाचू शकलेले नाही. विमानातील पाचही जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक अशी मृतांची नावे आहेत.
राजकीय वर्तुळात खळबळ
अजित पवार यांच्यासारख्या ताकदीच्या नेत्याचा अशा अपघाती निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.