"शाळा-कॉलेजमध्ये उघडपणे ड्रग्ज विक्री, सरकार नक्की करतंय काय?" राज ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 22:20 IST2026-03-19T22:18:43+5:302026-03-19T22:20:39+5:30
Raj Thackeray MNS Gudi Padwa Melava: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

"शाळा-कॉलेजमध्ये उघडपणे ड्रग्ज विक्री, सरकार नक्की करतंय काय?" राज ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येछे पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि शाळा आणि महाविद्यालयाबाहेर उघडपणे अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचे राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. राज ठाकरे यांनी इशारा दिला की, जर सरकारने या गंभीर प्रश्नांवर तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर येणारा काळ राज्यासाठी अधिक कठीण असेल. या सभेमुळे आगामी काळात सत्ताधारी आणि मनसे यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्यातील तरुण पिढीच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, "आज राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात उघडपणे ड्रग्जची विक्री सुरू आहे. आपली तरुण मुले-मुली या व्यसनाच्या गर्तेत अडकत चालली आहेत. हे अत्यंत भयानक असून राज्याच्या सामाजिक आरोग्यासाठी हा मोठा धोका आहे. जर खुद्द गृहमंत्र्यांनाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यवहार होत असल्याची आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्याची जाणीव आहे, तर मग सरकार नक्की काय करत आहे? पोलीस प्रशासन काय करत आहे?" असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
केवळ ड्रग्जच नव्हे, तर राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवरही त्यांनी प्रकाश टाकला. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राज्यातून अनेक तरुण मुले आणि मुली अद्याप गायब आहेत, ज्यांचा शोध घेण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. माहिती असूनही कारवाई का होत नाही, असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला.
राजकीय नेत्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, "आमच्याकडे सध्या फक्त आमदार, खासदार, कंत्राटदार आणि पैसा एवढेच सुरू आहे. राजकारण्यांना फक्त सत्ता टिकवण्यात रस आहे. महाराष्ट्र जणू काही विकायला काढला आहे. पण दुसरीकडे तरुण पिढी व्यसनाधीन होतेय आणि मुले पळवली जात आहेत, याकडे कोणाचेही लक्ष नाही", असेही राज ठाकरे म्हणाले.