Anjali Damania vs Devendra Fadnavis, Women Reservation: भारतीय संसदेत महिला आरक्षणावरून एक मोठा राजकीय आणि घटनात्मक वाद निर्माण झाला. नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक २०२६ हे असे विधेयक ठरले, जे लोकसभेत मंजूर झाले नाही. महिलांसाठी ३३% आरक्षणाचा कायदा आधीच अस्तित्वात आहे, पण सध्याच्या ५४३ जागांच्या लोकसभेत त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही. सरकारने लोकसभेच्या जागांची संख्या ५० टक्क्यांनी वाढवून ५४३ वरून ८१६ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि भविष्यात ती ८५० पर्यंत वाढवण्याची शक्यताही वर्तवली होती. पण त्यासोबतच डिलीमिटेशनचाही विषय मार्गी लावला जाणार होता. पण या विधेयकाला विरोधकांनी विरोध दर्शवला. याचमुद्द्यावरून सरकार आणि भाजपचे बडे नेतेमंडळी विरोधकांवर आगपाखड करताना दिसत आहेत. तशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरच हल्ला चढवला आहे.
अंजली दमानिया यांचा खोचक टोला
महिला आरक्षण विधेयकाच्या आडून मोदी सरकार देशाचे विभाजन करत आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी संसदेत केला. नव्याने मांडलेल्या प्रस्तावात दक्षिण भारतातील राज्यांचे महत्त्व कमी होईल, असाही दावा करण्यात आला. त्यामुळे या विधेयकाला संसदेत विरोधकांनी नकार दिला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर टीका केली. त्यामुद्द्यावरून अंजली दमानिया यांनी फडणवीसांनाच सुनावले. “विरोधी पक्ष बँड वाजवून डांस करावा, हे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ज्या भाजपने महाराष्ट्रात १४९ उमेदवारांमध्ये फक्त १५ महिला उमेदवार निवडणुकीत उभे केले, ते असे डायलॉग मारतात? वाह! महाराष्ट्रात ३९ मंत्र्यांमध्ये केवळ ४ महिला मंत्री आहेत. आता एक काम करा, मंत्रिमंडळ विस्तार करून ३३% (१३) महिला मंत्री आणा. पूर्ण महाराष्ट्र बँड वाजवून डांस करेल," असा खोचक टोला त्यांनी एक्स पोस्ट करत लगावला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
"देशाने आज विरोधकांची नौटंकी पाहिली, आपल्या नारीशक्तीच्या बाजुने उभं राहण्याची ऐतिहासिक संधी विरोधकांकडे होती, पण त्यांनी ती गमावली. विरोधक हे महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने फक्त भाषणांमध्ये आणि घोषणांमध्येच अस्तित्वात आहेत, म्हणूनच प्रगतीपेक्षा त्यांनी राजकारणाला प्राधान्य दिलं. नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करून त्यांनी नेमकं कोणाच्या हितासाठी काम करतात, हे स्पष्ट केलं आहे. विरोधी पक्षाने बँड वाजवून डांस करावा. भारताच्या महिला हे सगळं पाहत आहेत आणि त्या हे विसरणार नाहीत. पण, आमच्यासाठी महिला सशक्तीकरण केवळ भाषणांचा विषय नाही, तर एक बांधिलकी आहे. उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू आणि आपल्या नारीशक्तीला प्रत्येक हक्क, प्रत्येक न्याय आणि प्रत्येक सन्मान मिळवून देऊ," असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते.
Web Summary : Anjali Damania criticizes Devendra Fadnavis and BJP regarding women's reservation. She questions the BJP's commitment, citing low female representation in Maharashtra's government and past elections, demanding 33% women ministers.
Web Summary : अंजलि दमानिया ने महिला आरक्षण पर देवेंद्र फडणवीस और भाजपा की आलोचना की। उन्होंने महाराष्ट्र सरकार और पिछले चुनावों में कम महिला प्रतिनिधित्व का हवाला देते हुए भाजपा की प्रतिबद्धता पर सवाल उठाया, 33% महिला मंत्रियों की मांग की।