महानगरपालिकांनंतर असदुद्दीन ओवेसींच्या AIMIM चं पुढचं टार्गेट काय? केली मोठी घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 16:20 IST2026-01-20T16:18:35+5:302026-01-20T16:20:49+5:30
दरम्यान, या निकालामुळे स्पष्ट झाले आहे की, पक्ष मोठ्या राजकीय पटलावरही स्वतःला बळकट करू शकते, असा विश्वास ओवेसींनी व्यक्त केला आहे.

महानगरपालिकांनंतर असदुद्दीन ओवेसींच्या AIMIM चं पुढचं टार्गेट काय? केली मोठी घोषणा!
एआयएमआयएम महाराष्ट्राच्या राजकारणात आपले अस्तित्व सातत्याने दाखवत आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत शहरी भागातून मिळालेल्या यशाने पक्षाचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. दरम्यान, या निकालामुळे स्पष्ट झाले आहे की, पक्ष मोठ्या राजकीय पटलावरही स्वतःला बळकट करू शकते, असा विश्वास ओवेसींनी व्यक्त केला आहे.
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, पक्षातील अनेक नेत्यांचा विधानसभा निवडणुकीत अगदी कमी फरकाने पराभव झाला. जलील केवळ १,१०० मतांनी पराभूत झाले, तर नासिर सिद्दीकी देखील अगदी कमी फरकाने पराभूत झाले. शिवाजी नगर-मखुर्द विधानसभा मतदारसंघात ११,००० मतांचा फरक होता. मात्र, सध्याच्या महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांवरून २०,००० मतांची आघाडी दिसून येते. हा फरक पक्षाची तळागाळातील पकड मजबूत झाल्याचे दर्शवितो.
ओवेसी पुढे म्हणाले, "पक्ष आता जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करत आहे. "आपण आजच्या कामगिरीवर अवलंबून राहू शकत नाही. सुनील गावस्कर म्हणाले होते, शतक ठोकल्यानंतरही, तुम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागते. आपणही नव्याने सुरुवात करायाल हवी. जमिनीवर काम करायला हवे.
राज्यभर विस्ताराचे ध्येय -
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, नगरपालिका निवडणुकांमधून मिळालेल्या गतीला विधानसभा आणि जिल्हास्तरीय राजकारणापर्यंत वाढवण्यासाठी एक रणनीती आखली जात आहे. पक्षाचे लक्ष संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणे आणि स्थानिक मुद्द्यांद्वारे जनतेचा सहभाग वाढवणे आहे. हाच आधार राज्याच्या राजकारणात एआयएमआयएमची भूमिका आणखी बळकट करेल.