"राज्यातील 9 मंत्री भोंदू अशोक खरातचे भक्त, अत्यंत घृणास्पद...", संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:47 IST2026-03-20T15:45:06+5:302026-03-20T15:47:25+5:30
नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्यासोबत अनेक नेत्यांचे फोटो व्हायरल होत आहे. त्यात आता खासदार संजय राऊत यांनी या भोंदूचे राज्यातील ९ मंत्री नियमित भक्त होते, असा गौप्यस्फोट केला आहे.

"राज्यातील 9 मंत्री भोंदू अशोक खरातचे भक्त, अत्यंत घृणास्पद...", संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
"राज्यातील ९ मंत्री या भोंदू बाबाचे नियमित भक्त होते आणि ते अत्यंत घृणास्पद विधी करत होते", असा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारा गौप्यस्फोट उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे कोणते मंत्री भोंदू अशोक खरातला भेटायचे, भेटले आहेत; या चर्चेला तोंड फुटले आहे.
अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगणारा अशोक खरात हा महिलांवर अत्याचार करत होता. एका महिलेने तत्कार दाखल केल्यानंतर त्याचे काळी कृत्ये समोर आली. या प्रकरणावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "या भोंदू बाबाने पोलिसांना जी माहिती दिली आहे, ती जरी गोपनीय असली, तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातील नऊ मंत्री त्याचे नियमित भक्त होते."
महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारे प्रकरण
"हे मंत्री भोंदू बाबाकडे जाऊन अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करत होते. ही केवळ अंधश्रद्धा नसून, महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारे हे प्रकरण आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे", अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
रुपाली चाकणकर मूर्ख, खोटं बोलताहेत
या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अडकल्या आहेत. त्या शिवनिका संस्थानच्या विश्वस्त आहेत. या संस्थानचा अध्यक्ष अशोक खरात आहे. चाकणकरांवरही खासदार राऊत यांनी सडकून टीका केली आहे.
"महिला आयोगाच्या अध्यक्षांना मुख्यमंत्री पदावर कसे ठेवू शकतात? आधी त्यांना पदावरून दूर करावं. चौकशी समिती नेमून निकाल लागेपर्यंत पदावरून दूर ठेवावं. अनेक मंत्री त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सत्तेतील लोक दबावाचे राजकारण करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांना बडतर्फ केलं पाहिजे", असे संजय राऊत म्हणाले.
रुपाली चाकणकरांना कोण आणि का वाचवत आहे?
"महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत, त्यांच्यावर अनेक वेळा आरोप झाले आहेत. त्यांना कोण आणि का वाचवत आहे? हा प्रश्न मला पडतो. त्या भोंदू बाबाने अनेक महिलांचे शोषण केले. त्या मराठी महिला आहेत. रुपाली चाकणकर मूर्ख आहेत आणि त्या खोटं बोलत आहेत. त्यांनी एक मिनिटही पदावर राहायला नको. मुख्यमंत्र्यांनी कान, डोळे बंद केले आहेत", अशी टीका खासदार राऊत यांनी केली.