चाकूर (जि.लातूर) : चाकुरातील देवांश मंगेश स्वामी (७ वर्षे) या बालकाचा तिच्या चुलतीने गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी घडली होती. ही घटना शेतजमिनीच्या वाटणीवरून घडल्याची फिर्याद दिल्याने रविवारी रात्री गुन्हा झाला होता. मात्र, पोलिस तपासात या प्रकरणाला पूर्णपणे कलाटणी मिळाली आहे. आरोपीच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यातून आरोपी पत्नीने स्वत:च्या आणि दिराच्या मुलाच्या अपहरणाचा बनाव रचून दिराच्या मुलाचा खून केला व पतीच्या मैत्रिणीला अडकविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत दिली.
या प्रकरणी अनिता स्वामी हिच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून तिला रात्रीच अटक करण्यात आली. सोमवारी चाकूरच्या न्यायालयाने तिला २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत. चाकूर येथील पुजारी चंद्रकांत स्वामी यांचे नातू साईचरण आणि त्याचा चुलत भाऊ देवांश हे रविवारी सकाळी ७वा.च्या सुमारास घराबाहेर गेले होते. ते घरी परतले नसल्याने पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा घराजवळील एका पडक्या वाड्यात ट्रॅक्टरच्या टायरच्या आडोशाला देवांशचा मृतदेह आढळला. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी तपासाची चक्रे गतिमान केली.
पाेलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये विसंगती...
फिर्यादी मंगेश स्वामी यांची भावजय अनिता दिनेश स्वामी हिचे वर्तन संशयास्पद असल्याचे आढळले. अनिताचा मोबाइल दोन तास बंद होता. तिने केलेल्या आणि आलेल्या कॉलची पडताळणी करण्यात आली, तेव्हा ती काही काळ घराबाहेर होती. चौकशीत विसंगत माहिती येत असल्याने पोलिसांनी तिच्यावर अधिक लक्ष केंद्रित केले होते.
अनैतिक संबंध असलेल्या महिलेस अडकविण्याचा प्रयत्न...
अनिता स्वामी यांच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यांच्या वादातून पोलिसात एक तक्रार दाखल होती. त्यावरून अनिता व तिच्या पतीमध्ये वारंवार वाद, भांडणे होत असत. स्वतःच्या दिराचा मुलगा देवांश याच्या अपहरणाचा बनाव रचून त्याचा खून केला. हा आरोप पतीसोबत अनैतिक संबंध असलेल्या महिलेवर टाकून तिला अडकविण्यासाठी कट अनिता स्वामी हिने रचला. गुन्हा लपविण्यासाठी मृतदेह बाजूच्या पडक्या वाड्यात टाकून दिले, असे तपासात निष्पन्न झाल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
पाेलिस पथकांकडून कसून तपास सुरू...
देवांशचा खून करण्याच्या कटात कोणकाेण सहभागी आहेत, नेमका कशा पद्धतीने खून करण्यात आला, साईचरणला लातूरपर्यंत कोणी सोडले, याचा तपास सुरू आहे. तपासात सीसीटीव्हीचे फुटेज महत्त्वाचे ठरल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले. यावेळी पोलिस उपअधीक्षक रविंद्र चौधर, पोनि. बालाजी भंडे उपस्थित होते.