मूळच्या नेपाळी नागरिकाचे कोल्हापुरात निधन, आधार कार्ड नसल्याने अंत्यसंस्कारासाठी ८ तासांची तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 17:13 IST2026-05-16T17:12:22+5:302026-05-16T17:13:48+5:30
नेपाळचे नागरिकत्व प्रमाणपत्र दाखवल्यावर त्यांनी रीतसर तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर त्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी शेंडा पार्कात पाठवले

मूळच्या नेपाळी नागरिकाचे कोल्हापुरात निधन, आधार कार्ड नसल्याने अंत्यसंस्कारासाठी ८ तासांची तारांबळ
कोल्हापूर : ते मूळचे नेपाळचे. दहा-बारा वर्षे कोल्हापुरात मध्यवर्ती स्टॅण्डवरील चायनीज गाडीवर ते कूक म्हणून काम करून पोट भरत होते. दोन्ही किडन्या खराब झाल्याने त्यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांचे आधार कार्ड नसल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल आठ तास मानवसेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या यंत्रणांकडे प्रयत्न करावे लागले. कृष्णबहाद्दर बंब (वय ४२, जि. कैलाली, नेपाळ) असे त्यांचे नाव आहे.
घडले ते असे : बंब हे पत्नी, मुलासह ताराबाई पार्कात राहत होते. त्यांच्याकडे नेपाळचे नागरिकत्व प्रमाणपत्र होते. चाजनीज गाडीवर कूक म्हणून रात्री उशिरापर्यंत काम करायचे आणि त्यातून कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा असा दिनक्रम. गेल्या काही दिवसांपासून किडनीचा त्रास वाढल्याने त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी उपचाराला फारशी संधी नसल्याने पेशंटला घरी घेऊन जावा म्हणून सांगितले. त्यामुळे त्यांना घरी आणले आणि गुरुवारी सायंकाळी ६ वाजता त्यांचे निधन झाले. मृत्यू दाखल्यासाठी स्थानिक शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी पत्र दिले; परंतु अशा नुसत्या पत्रावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असे स्मशानभूमीत सांगण्यात आले.
मग फेरीवाले संघटनेचे नेते दिलीप पोवार यांच्याशी कुणीतरी संपर्क साधला. त्यांनी मानवसेवा संस्थेचे व फेरीवाल्यांचे कार्यकर्ते रघुनाथ कांबळे यांना ही कल्पना दिली. त्यांनी स्थानिक नगरसेवक दीपाली घाटगे यांच्याशी संपर्क साधला; परंतु तिथेही आधार कार्डशिवाय दाखला देण्यात अडचण आली. मग शाहुपुरी पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी मृतदेह सीपीआरला नेण्याचा सल्ला दिला. मृतदेह पुन्हा सीपीआरला नेण्यात आला.
तिथे नेपाळचे नागरिकत्व प्रमाणपत्र दाखवल्यावर त्यांनी रीतसर तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर त्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी शेंडा पार्कात पाठवले. तिथे राजारामपुरी, शाहुपुरीचे पोलिस आले, त्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. ते झाल्यावर मगच सीपीआरने मृत्यू प्रमाणपत्र दिले. ते मिळाल्यानंतर मृतदेह कदमवाडी स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले; परंतु हे सगळे करेपर्यंत मध्यरात्रीचे दोन वाजले होते.