जिल्ह्यात भाजपा संपवण्याचं काम मंत्री मुश्रीफ करताहेत; चंदगडचे आमदार शिवाजी पाटलांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 13:20 IST2026-04-16T13:19:45+5:302026-04-16T13:20:08+5:30
‘गोकुळ’साठी मुख्यमंत्री फडणवीस-पक्षही पाठीशी,आता हे चालू देणार नाही,पुरावे जमा करतोय ‘केडीसी’वरही बोलणार !

जिल्ह्यात भाजपा संपवण्याचं काम मंत्री मुश्रीफ करताहेत; चंदगडचे आमदार शिवाजी पाटलांचा आरोप
गडहिंग्लज - मंत्री हसन मुश्रीफ यांनी 'काँग्रेस'शी हातमिळवणी करून जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप व शिंदेसेनेचे उमेदवार पाडले. महायुती सरकारमध्ये राहून, सरकारचे संरक्षण घेवून ते जिल्ह्यातील भाजप संपविण्याचे काम करीत आहेत. 'युतीधर्म' म्हणून दीडवर्ष सहन करीत आहोत. परंतु, ते खातात ‘महायुती’च आणि गाणं गातात ‘महाविकास’चं आघाडीचं, असा घणाघाती आरोप चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी येथील पत्रकार परिषदेत केला.
‘गोकुळ’मधील तथाकथित गैरकारभाराबाबत आमदार पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत मंत्री मुश्रीफ यांनी केलेल्या खुलाशानंतरही त्यांनी आपल्या भूमिकेचा पुर्नरूच्चार केला. मंत्रीपदाच्या जोरावर ‘गोकुळ’मधील भ्रष्ट व मनमानी कारभाराला ते पाठीशी घालत आहेत.परंतु,'गोकुळ’च्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षही माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे आता हे चालू देणार नाही.'केडीसीसी’ बँकेच्या कारभाराचेही पुरावे जमा करत असून पुरावे मिळताच त्यावरही बोलणार आहे,असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांचे धोरण ‘काँग्रेसमुक्त भारत’ असले तरी मुश्रीफ 'कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त' करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक हेच निर्णय घेतील,असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील,शांताराम पाटील, गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी संचालक अँड.हेमंत कोलेकर,संकेश्वर कारखान्याचे संचालक सोमगोंडा आरबोळे, नेसरीच्या सरपंच गिरीजादेवी शिंदे,माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी आदी उपस्थित होते.
शिवाजीराव पाटील यांचे आरोप
‘गोकुळ’च्या ठरावासाठी भाजपाला वगळून 'महाविकास'च्या संचालकांना ‘टोकण’साठी पैसे पुरवले.
‘गोकुळ’च्या बिनविरोधाचा प्रस्ताव घेवून मुश्रीफांचे संचालक सतेज पाटील यांना भेटले.सगळे काही भाजपाला वगळूनच सर्व राजकारण सुरू आहे.
मुश्रीफ पाचवेळा मंत्री झाले, ‘कागल’ला भरभरून दिले. परंतु, ‘चंदगड’ला कांहीच दिले नाही.
सर्वपक्षीयांनी साथ द्यावी
सहायक निबंधक (दुग्ध) सुजय कदम यांची बदली आणि ‘गोकुळ’वर प्रशासक नेमणुकीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असून त्याला लवकरच यश येईल. वाढीव १२०० सभासदांना मान्यता मिळाल्यास चंदगड, आजरा, गडहिंग्लजवर कायमचा अन्याय होणार असल्याने प्रसंगी जनआंदोलनही करावे लागेल, त्याला राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीयांनी साथ द्यावी, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
माझा अपमान करू नका
२०१९ मध्ये अवघ्या १६०० मतांनी पराभव झाल्यानंतरही सातत्याने काम केल्याने पक्षाने १०४ कोटीचा निधी दिला. २०२४ मध्ये अपक्ष लढूनही २५ हजार मतांच्या फरकाने निवडून आलो. मुश्रीफ मोठे मंत्री असले तरी त्यांनी माझा अपमान करू नये. छोटा असलो तरी भाजपाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे म्हणूनच मुख्यमंत्री आपल्या पाठीशी आहेत. सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढणार आहे. त्यामुळे माझा बोलवता धनी कोण ? हे शोधण्याच्या भानगडीत पडू नका असा सल्लाही आमदार पाटील त्यांनी दिला.