प्रेम आहे तर बोलणं का बंद केलं? कल्याणमध्ये दिराने केली वहिणीची हत्या, २० मिनिटे उशीर झाला असता तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 20:32 IST2026-05-19T20:31:42+5:302026-05-19T20:32:49+5:30
वहिणीची हत्या करुन पळ काढणाऱ्या दिराला कल्याण पोलिसांनी शिताफिने अटक केली.

प्रेम आहे तर बोलणं का बंद केलं? कल्याणमध्ये दिराने केली वहिणीची हत्या, २० मिनिटे उशीर झाला असता तर...
Kalyan Crime: कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक संबंधांतून झालेल्या हत्येच्या गुन्ह्याचा पोलिसांनी अत्यंत नाट्यमयरीत्या छडा लावला आहे. प्रेमसंबंध असलेल्या वहिनीने बोलणे बंद केल्याच्या रागातून दिरानेच तिचे डोके भिंतीवर आपटून तिची हत्या केली. गुड्डू देवी असे मृत महिलेचे नाव असून, बम बम कुमार असे हत्या करणाऱ्या नराधम दिराचे नाव आहे.
सुरुवातीला अपघाताचा संशय, तपासात उघड झाले संबंध
या प्रकरणाची सुरुवात २७ एप्रिल रोजी झाली. कल्याण पश्चिमेकडील घरात गुड्डू देवी या अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत सापडल्या होत्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ११ मे रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरुवातीला घरगुती अपघात असावा असा संशय होता. पण खडकपाडा पोलिसांनी जेव्हा सखोल तपास सुरू केला, तेव्हा कुटुंबातील अंतर्गत वादाचे कारण समोर आले. मृत गुड्डू देवी आणि त्यांचा दिर बम बम कुमार यांच्यात गेल्या काही काळापासून अनैतिक प्रेमसंबंध होते, ज्याची कल्पना दोन्ही कुटुंबांनाही होती. मृत महिलेला दोन मुले आहेत, तर आरोपीलाही एक मुलगी आहे.
'प्रेम आहे तर बोलणं का बंद केलं?'
काही दिवसांपासून गुड्डू देवी यांनी बम बम कुमारसोबत असलेले संबंध तोडण्याचा प्रयत्न करत त्याच्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते. याच गोष्टीचा प्रचंड राग आरोपीच्या मनात होता. २७ एप्रिल रोजी तो याच कारणावरून जाब विचारण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. आपले प्रेमसंबंध असूनही माझ्याशी बोलणं का बंद केलं? असे म्हणत दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात बम बम कुमारने गुड्डू देवी यांचे डोके जोराने भिंतीवर आपटले. यामुळे त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि त्या जखमी झाल्या.
झारखंडमध्ये 'फिल्मी' थरार
गुन्हा केल्यानंतर आरोपीने स्वतःचा मोबाईल बंद करून पळ काढला होता. तांत्रिक पुरावे मिळत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. अखेर नातेवाईकांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपीच्या मूळ गावाचा सुगावा लागला. खडकपाडा पोलिसांचे एक विशेष पथक थेट झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यात रवाना झाले.
कल्याण पोलिसांनी स्थानिक झारखंड पोलिसांची मदत घेतली. दरम्यान, पोलिसांचे पथक आपल्या मागावर असल्याची कुणकुण आरोपी बम बम कुमारला लागली होती. त्यामुळे त्याने तिथून थेट नेपाळ देशात पळून जाण्याचा प्लॅन आखला होता आणि तो आंतरराष्ट्रीय सीमेच्या दिशेने निघालाही होता.
अवघ्या २० मिनिटांचा फरक
कल्याणच्या पोलीस पथकाने स्थानिक यंत्रणेच्या मदतीने अत्यंत वेगाने हालचाली करत सीमा भागातच आरोपी बम बम कुमारला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर या कारवाईत पोलिसांना केवळ २० मिनिटांचा उशीर झाला असता, तर आरोपी नेपाळच्या हद्दीत प्रवेश करण्यात यशस्वी ठरला असता आणि त्याला पकडणे अशक्य झाले असते. झारखंडमधून अटक करून आरोपीला कल्याणमध्ये आणण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.