कल्याणमध्ये भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई जोशी स्मारकाचे भूमीपूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 17:48 IST2026-04-26T17:48:34+5:302026-04-26T17:48:42+5:30
या स्मारकात महिलांसाठी जिम, प्रशिक्षण केंद्र आणि ऑडीटोरियमसारख्या आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत.

कल्याणमध्ये भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई जोशी स्मारकाचे भूमीपूजन
कल्याण: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या स्मारकाचा भूमी पूजन राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय महिला समन्वयक संरक्षिका गीता गुंडे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी करण्यात आले. हे स्मारक कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरातील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रा लगत उभारले जाणार आहे.
या प्रसंगी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह आमदार सुलभा गायकवाड, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहूल दामले, भाजप नगरसेविका हेमलता पवार, शिंदे सेनेच्या नगरसेविका शालीनी वायले आदी उपस्थित होते. माजी आमदार पवार यांनी स्मारकासाठी निधी मिळावा याकरीता पाठपुरावा केला होता. मुख्यमत्री असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी या स्मारकासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून हे स्मारक उभारले जाणार आहे.
या स्मारकात महिलांसाठी जिम, प्रशिक्षण केंद्र आणि ऑडीटोरियमसारख्या आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे स्मारक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. डॉ आनंदीबाई जोशी यांच्या प्रेरणादायी कार्याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न या स्मारकाच्या माध्यमातून केला जाणार आहे.
या प्रसंगी मुंडे यांनी सांगितले की, त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतले. त्या डॉक्टर झाल्या ही प्रेरणादायी गोष्ट होती. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. डॉक्टरकी ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेची भावना असल्याचे अधोरेखित केले. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी हे जोशी यांचे स्मारक भविष्यात महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याचा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.
आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी कल्याण येथे झाला. त्यांचे लहानपणीचे नाव यमुना होते. लहान वयातच त्यांचे लग्न झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना एक मुलगा झाला. पण दुर्दैवाने योग्य उपचार न मिळाल्यामुळे तो काही त्याचे निधन झालेे. त्यांनी त्यांच्या दु:खावर मात करुन अमेरीकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतले. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळविला.