कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 20:20 IST2026-04-22T20:19:45+5:302026-04-22T20:20:15+5:30
कल्याणमधील बाजारपेठ पोलिस त्यांच्या तक्रारीला दाद देत नसल्याचा आरोप मुदलीयार यांनी केली आहे.

कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
कल्याण : कल्याणमधील रहिवासी विजय मुदलीयार यांना एक लिंक पाठवून त्याद्वारे त्यांची ७० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी त्यांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईनला कळविले. हेल्पलाईनला त्यांची तक्राराची दखल घेतली गेली. मात्र कल्याणमधील बाजारपेठ पोलिस त्यांच्या तक्रारीला दाद देत नसल्याचा आरोप मुदलीयार यांनी केली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक फसवणूकीमुळे हतबल झालेल्या मुदिलीयार यांनी आत्ता कोणाकडे दाद मागायची असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
कल्याण पश्चिमेतील लाल चौकी परिसरात राहणारे मुदलीयार हे खाजगी नोकरी करतात. त्यांना ७ एप्रिल रोजी त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना सांगितले की, त्यांच्या क्रेडीड कार्ड संदर्भात काही तरी इश्यू झाला आहे. त्याकरीता एक लिंक पाठवितो. ती लिंक तूम्ही ओपन करा. त्यानंतर तुमची समस्या दूर होईल. मुदलीयार यांनी ती लिंक ओपन केली. त्यानंतर १० एप्रिलला त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या बँकेतील खात्यातून १२ वेळा आर्थिक व्यवहार केला गेला. त्यांच्या खात्यातून १२ वेळा ३ हजार ५९९ रुपये काढले गेले आहे.
ही रक्कम जवळपास ४३ हजार रुपये इतकी होते. हा व्यवहार उत्तर प्रदेशातील नोयेडा येथील रिलायन्स डिजिटलमधून करण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, १६ एप्रिलपर्यंत त्यांचा सुरु असलेला मोबाईल नंबर हा अनाचक पोर्ट करण्यात आला आहे. त्यांचा नंबर ही बंद दाखवित होता. या प्रकरणी त्यांनी जिओ आणि एअरटेल कंपनीच्या गॅलरीत जाऊन चौकशी केली. दोन्ही कंपनीच्या गॅलरीतून त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यांच्या सॅलरी अकाऊंटमधूही १८ हजार आणि दुसऱ्या एका अकाऊंटमधून १० हजार रुपये काढून त्यांची जवळपास एकूण ७० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
त्यांना ज्या नंबरहून फोन आला होता तो नंबर झारखंडचा आहे. हा सगळा फसवणूकीचा प्रकार लक्षात येताच मुदलीयार यांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन नंबर १९३० वर संपर्क साधला. त्याठिकाणी त्यांच्या तक्राराची दखल घेतली गेली. मात्र मुदलीयार हे कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्यात गेले असता त्यांनी पोलिसांनी सांगितले की, हेल्पलाईनहून आम्हाला काही माहिती मिळालेली नाही अशी बोळवण केली. त्यामुळे आत्ता आमच्या फसवणूकी संदर्भात आम्ही न्याय कुणाकडे मागायचा ?असा संतप्त सवाल मुदलीयार यांनी उपस्थित केला आहे.