'आई-बाबा, आता मी तुम्हाला त्रास देणार नाही...'; नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने संपवला आयुष्याचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 19:17 IST2026-02-26T18:58:30+5:302026-02-26T19:17:05+5:30
बारावीत नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले.

'आई-बाबा, आता मी तुम्हाला त्रास देणार नाही...'; नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने संपवला आयुष्याचा प्रवास
Kalyan Crime: कल्याणमध्ये एका विद्यार्थीनीने बारावीच्या परीक्षेच्या निकालाच्या भीतीने जगाचा निरोप घेतला आहे. कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात ही सुन्न करणारी घटना घडली. अक्षरा नितीन रेणुसे (१७) असे या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव असून, आपण नापास होऊ या भीतीने तिने आपल्या राहत्या घरी जीवनयात्रा संपवली.
शेवटच्या क्षणीही आई-वडिलांचीच काळजी
अक्षराने पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या भावना एका लिहिल्या होत्या. या चिठ्ठीतील मजकूर वाचताना उपस्थित असलेल्यांचे डोळे पाणावले. "मी गेल्यावर आई-बाबा तुम्ही त्रास करून घेऊ नका. यापुढे मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही," असे भावनिक शब्द तिने लिहिले होते. अक्षराने परीक्षेच्या तणावासमोर हार मानल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेचा घटनाक्रम
अक्षरा कल्याणमधील एका नामांकित महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत तिला काही पेपर कठीण गेले होते. बुधवारी सकाळी घरातील पोटमाळ्यावर तिने गळफास घेतल्याचे कुटुंबीयांना कळले. तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मनातील वादळ कोणालाच कळले नाही
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षरा स्वभावाने शांत होती. परीक्षेचे दडपण किंवा पेपर कठीण जात असल्याबाबत तिने कधीही आई-वडील किंवा मैत्रिणींशी चर्चा केली नव्हती. नापास झाल्यास कुटुंबाची बदनामी होईल किंवा त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भीती तिच्या मनात असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सामान्य दिसणाऱ्या अक्षराच्या मनात किती मोठे वैचारिक वादळ सुरू होते, याची कल्पना कोणालाच आली नाही.
दहावी-बारावीच्या परीक्षा तणावमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी सरकारकडून समुपदेशक आणि डॉक्टरांची नियुक्ती केली जाते. मात्र, तरीही विद्यार्थी आपल्या पालकांना विश्वासात न घेता टोकाचे पाऊल उचलत असल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, यामागे काही अन्य कारणे आहेत का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.