Axar Patel Statement After DC Collapse To 75 And Loss Against RCB : गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स संघानं दिल्ली कॅपिटल्सला घरच्या मैदानावर ९ विकेट्सनी पराभूत करत बंगळुरुच्या मैदानातील पराभवाचा बदला घेतला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्लीची फलंदाजी अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. सामन्याला सुरुवात झाल्यावर अर्धा तासांत दिल्ली कॅपिल्सच्या ताफ्यातील ६ फलंदाज तंबूत परतले होते. परिणामी दिल्लीच्या संघ ७५ धावांत आटोपला. या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना किंग कोहलीनं सिक्सर मारत ८१ चेंडू राखून विजय मिळवून दिला. या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल खूपच निराश आणि हताश दिसला. "न कळत सार घडलं..." असे म्हणत त्याने जे घडलं त्यावर विश्वास बसत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सामन्यानंतर काय म्हणाला अक्षर पटेल?
सामन्यानंतर अक्षर पटेल म्हणाला की, "मला अजूनही समजत नाहीये की, आज नेमकं काय झालं. क्रिकेटमध्ये नेहमी तयार राहणं गरजेचं असतं. इथं एकही दिवस हलक्यात घेऊन चालत नाही. जे झालं त्यावर विचार करत बसण्यापेक्षा पुढे काय करायचं यावर लक्ष केंद्रित करायला हवं."
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
आमचा दिवस खराब होता, पण...
अक्षरने मान्य केलं की, दिल्लीसाठी हा अत्यंत खराब दिवस होता. मात्र, त्याने भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूडच्या गोलंदाजीचंही विशेष कौतुक केलं. आज आमचा दिवस खराब होता. पण आम्हाला सकारात्मक राहून पुढे जायचं आहे. भुवनेश्वर आणि हेजलवूडच्या गोलंदाजीचं मला आश्चर्य वाटत नाही. ते जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. जर सुरुवातीच्या एक-दोन षटकांत आमच्या सलामीवीरांनी किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाने काही धावा केल्या असत्या, तर एवढी वाईट वेळ आली नसती, ही गोष्टही त्याने बोलून दाखवली.
IPL मधील निच्चांकी धावसंख्या नावे होण्याचं संकट टळलं
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात पॉवर प्लेमध्ये १३ धावांत दिल्ली कॅपिटल्सने ६ विकेट्स गमावल्या. आतापर्यंतच्या इतिहासातील पॉवरप्लेमधील ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. ही स्कोअर लाइन पाहता आयपीएलच्या इतिहासातील RCB च्या नकोसा निच्चांकी धावसंख्येचा विक्रम दिल्ली कॅपिटल्सच्या नावे होतो की, काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण अभिषेक पोरेल ३० (३३), डेविड मिलर १९ (१८) आणि कायले जेमिसन १२ (१३) यांच्या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सनं ७५ धावांपर्यंत मजल मारली. आयपीएलच्या इतिहासात सर्वात निच्चांकी धावसंख्येचा रेकॉर्ड हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावे आहे. २०१७ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ते अवघ्या ४९ धावांत आटोपले होते.