'ऑपरेशन सिंदूर' पाकिस्तानला झेपलंच नाही, घाबरून केली युद्धबंदीची घोषणा! परदेशी अहवालात दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 09:05 IST2026-01-26T09:04:38+5:302026-01-26T09:05:20+5:30
Operation Sindoor, India Pakistan War: स्विस लष्करी थिंक टँक 'सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्स्पेक्टिव्ह स्टडीज' (CHPM) ने ४७ पानांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

'ऑपरेशन सिंदूर' पाकिस्तानला झेपलंच नाही, घाबरून केली युद्धबंदीची घोषणा! परदेशी अहवालात दावा
Operation Sindoor, India Pakistan War: स्विस लष्करी थिंक टँक 'सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्स्पेक्टिव्ह स्टडीज' (CHPM) ने ४७ पानांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलानेपाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. ७ ते १० मे २०२५ पर्यंत चाललेल्या ८८ तासांच्या संघर्षादरम्यान, भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले आणि तळ उद्ध्वस्त केले. राफेल आणि मिराज-2000 विमानांचा वापर करून, हवाई दलाने बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद मुख्यालय आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाला लक्ष्य केले होते. पाकिस्तानची PL-15 क्षेपणास्त्रे आणि ९०० हून अधिक ड्रोन असूनही, भारताच्या S-400 आणि हवाई संरक्षण नेटवर्कने बहुतेक हल्ले हाणून पाडले. अखेर, प्रत्युत्तर देण्याची क्षमता गमावल्यानंतर पाकिस्तानने १० मे रोजी दुपारपर्यंत युद्धबंदीची (Ceasefire) विनंती केली, जी भारताने मान्य केली, असाही दावा स्विस अहवालात केला गेला आहे.
७ मे ची रात्र अन् युद्धाची चाहूल...
७ मे च्या रात्री भारतीय हवाई दलाच्या राफेल आणि मिराज-२००० विमानांनी सीमा ओलांडून जैश आणि लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयावर हल्ला केला, तेव्हा संघर्ष सुरू झाला. पाकिस्तान हवाई दलाने (पीएएफ) ३० हून अधिक लढाऊ विमाने आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
पाकचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले अयशस्वी
भारतीय रडार सक्रिय करण्यासाठी आणि धोके ओळखण्यासाठी पाकिस्तानने ७ मे पासून ड्रोनच्या दोन मोठ्या तुकड्या (एकूण ९०० हून अधिक ड्रोन) तैनात केल्या होत्या. पण भारताच्या आकाशातील नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगमुळे पाकिस्तानची रणनीती अयशस्वी झाली. अर्ध्याहून अधिक ड्रोन केवळ तोफांच्या माऱ्यात खाली पाडण्यात आले. भारताच्या S-400 प्रणाली किंवा इतर महत्त्वाच्या लष्करी मालमत्तेचे नुकसान करण्यात पाकिस्तान पूर्णपणे अपयशी ठरला.
भारताचे प्रत्युत्तर आणि पाकिस्तानचा पराभव
१० मे रोजी पहाटे २ ते ५ च्या दरम्यान, भारताने ब्राह्मोस आणि स्कॅल्प-ईजी सारख्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करून पाकिस्तानी हवाई तळांवर आणि रडार सुविधांवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी लढाऊ विमाने, रडार आणि कमांड सेंटर नष्ट झाले. धावपट्टी नष्ट झाल्यामुळे पाकिस्तानी हवाई दल घाबरले आणि दुपारपर्यंत आत्मसमर्पण करून युद्धबंदीची विनंती करण्यास भाग पाडले गेले, असाही दावा करण्यात आला आहे.
लष्करी इतिहासकार एड्रियन फोंटानेलाझ यांनी तयार केलेल्या या अहवालाचे पुनरावलोकन स्विस हवाई दलाच्या निवृत्त मेजर जनरलसह तज्ज्ञांच्या पॅनेलने केले. अहवालात असा निष्कर्ष काढला आहे की भारताने आपले राजकीय-लष्करी उद्दिष्टे यशस्वीरित्या साध्य केली. भारताने दहशतवादी पायाभूत सुविधांना दणका दिलाच, पण त्यासोबत पाकिस्तानची हवाई प्रत्युत्तर क्षमता देखील निष्प्रभ केली, ज्यामुळे आधुनिक काळातही युद्ध लांबण्याऐवजी पटकन संपले.