'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 08:27 IST2026-05-11T08:26:07+5:302026-05-11T08:27:53+5:30
भाजपासाठी खरे तर ती एक ऐतिहासिक घटना होती; कारण त्या राज्यात पक्ष पहिल्यांदाच सत्तेवर आला आहे. जानेवारीत गृह मंत्रालयाने राष्ट्रीय गीतासंदर्भात जारी केलेल्या निर्देशामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.

'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
-हरीश गुप्ता, नवी दिल्ली
राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम्' गाण्याच्या मुद्द्यावर, टीव्हीके प्रमुख विजय यांनी भाजपला बॅकफूटवर ढकलले. रविवारी विजय यांच्या शपथविधीत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत, राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम्' गायले गेले. शेवटी, 'वंदे मातरम्' व 'जन गण मन' राष्ट्रगीतानंतर, 'तामिळ थाई वाळ्तू' हे राज्यगीत वाजवण्यात आले; हा क्रम याच पद्धतीने पाळला गेला.
याच्या एक दिवस आधी शनिवारी कोलकातात 'ब्रिगेड परेड ग्राउंड' वर सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी पार पडला, तेव्हा तिथे 'वंदे मातरम्' वाजवण्यात आले नव्हते. भाजपसाठी खरे तर ती एक ऐतिहासिक घटना होती; कारण त्या राज्यात पक्ष पहिल्यांदाच सत्तेवर आला आहे.
१८८२ मध्ये प्रख्यात बंगाली साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या या गीताच्या संदर्भात ही बाब विशेषत्वाने लक्षात घेण्यासारखी आहे. जानेवारीत गृह मंत्रालयाने राष्ट्रीय गीतासंदर्भात जारी केलेल्या निर्देशामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.
टागोरांचा अवमान म्हणत ममतांनी केला होता विरोध
बंगाल आणि तामिळनाडू यांसह चार राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताला, 'जन गण मन' या राष्ट्रगीताच्या बरोबरीचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. पश्चिम बंगालच्या तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निर्देशास रवींद्रनाथ टागोर यांचा अवमान असल्याचे संबोधले होते.
टागोर यांनी रचलेले राष्ट्रगीत, 'वंदे मातरम्' नंतर वाजवले जाऊ नये, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. गृह मंत्रालयाच्या या निर्देशामुळे, १९५० मध्ये संविधान सभेने स्वीकारलेल्या 'वंदे मातरम्'ची केवळ दोन कडवी गाण्याच्या प्रथेपासून फारकत घेतली गेली होती.
मल्लिकार्जून खरगे यांचे टीकास्त्र
या वादानंतर, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे की, ही बाब अत्यंत विसंगत वाटते. जे लोक स्वतः राष्ट्रवादाचे रक्षक असल्याचा सातत्याने दावा करतात, त्यांनी स्वतः कधीही 'वंदे मातरम्' गायलेले नाही. यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान सर्व देश जाणतो, असे खरगे उपहासाने म्हणाले.