हळदीचे भाव पडल्याने हिंगोलीत शेतकरी आक्रमक;लिलाव बंद पाडले, प्रवेशद्वारालाही फासले काळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 18:16 IST2026-05-06T18:12:39+5:302026-05-06T18:16:08+5:30
हळदीच्या पडत्या भावावरून संताप; क्रांतिकारी शेतकरी संघटनेने लिलाव बंद पाडला

हळदीचे भाव पडल्याने हिंगोलीत शेतकरी आक्रमक;लिलाव बंद पाडले, प्रवेशद्वारालाही फासले काळे
हिंगोली : शेतकऱ्यांचे ‘पिवळे सोने’ म्हणून ओळख असलेली हळद यंदा पडत्या भावात विक्री करावी लागत आहे. त्यातच ५ मे रोजी बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीसाठी आणलेली काही शेतकऱ्यांची हळद अवकाळी पावसात भिजली. त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने संताप व्यक्त करीत ६ मे रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर आंदोलन करीत हळदीचा लिलाव काहीवेळ बंद पाडला. यावेळी बाजार समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला काळे फासून निषेध व्यक्त करण्यात आला.
हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादनात अग्रसेर आहे. अलिकडच्या काळात बेणे, खतांचे गगणाला भिडलेले दर, मजुरीच्या दरात झालेली वाढ यामुळे लागवडखर्च वाढत चालला आहे. त्यातच नैसर्गिक संकटाच्या माऱ्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. अनेक संकटांना तोंड देऊन शेतकरी हळद पिकवित आहेत. मात्र, शेतकऱ्यांची हळद बाजारात येताच भाव पडतात. सध्याही बाजारात भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
त्यातच मंगळवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे पाणी बाजार समितीत विक्रीसाठी आणलेली हळदीपर्यंत पोहोचले. यात काहीं शेतकऱ्यांची हळद भिजल्याने नुकसान झाले. यावरून क्रांतिकारी शेतकरी संघटनेने संताप व्यक्त करीत बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समिती गाठून कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. यादरम्यान बाजार समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला काळेही फासले. यादरम्यान, सचिव संपत मुंढे, माजी सचिव नारायण पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर हळद खरेदी- विक्रीची प्रक्रिया पूर्ववत सुरू झाली.
आंदोलनात मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, तालुकाध्यक्ष प्रवीण मते, चैतन्य चव्हाण, सखाराम भाकरे, विठ्ठल वायचाळ, राम चव्हाण, संतोष सावके, संदीप पाटील, मनोहर पाटील, अशोक जयस्वाल, विशाल पौळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
आंदोलनातून या मागण्यांकडे वेधले लक्ष...
1. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या हळदीला योग्य भाव मिळावा.
2. बाजार समिती मार्केट यार्डात दाखल झालेल्या हळदीचा लिलाव आणि मोजमाप एका दिवसांत करावा.
3. विक्रीसाठी आणलेल्या हळदीचे पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी उपाययोजना कराव्यात.
4. मार्केट यार्डात वजनकाट्यांची संख्या वाढविण्यात यावी.
5. मार्केट यार्डात भिजलेल्या हळदीला योग्य भाव द्यावा.