भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 09:16 IST2026-05-07T09:15:53+5:302026-05-07T09:16:36+5:30
भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेतील जाफना शहराच्या उपनगरातील चेम्मानी येथील सामूहिक कबरींच्या उत्खननाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेतील जाफना शहराच्या उपनगरातील चेम्मानी येथील सामूहिक कबरींच्या उत्खननाचे काम पुन्हा सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गेल्या सात महिन्यांपासून निधीच्या अभावामुळे रखडलेले हे काम आता पुन्हा सुरू होणार असून, यामुळे दशकांपूर्वीच्या गृहयुद्धातील अनेक काळी गुपिते बाहेर येण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी या ठिकाणी ४५ दिवस चाललेल्या उत्खननात तब्बल २४० मानवी सांगाडे बाहेर काढण्यात आले. त्यावेळी तिथे मिळालेल्या वस्तू पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. या वस्तूंमध्ये लहान मुलांना दूध पाजण्याच्या बाटल्या आणि खेळणी आढळून आल्या आहेत. निधी वाटपातील विलंबामुळे गेल्या सप्टेंबरमध्ये हे उत्खनन थांबवण्यात आले. मात्र, आता या कार्यासाठी २.१ दशलक्ष श्रीलंकन रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी या कामादरम्यान काही अवशेष सापडल्यानंततरर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आली.
हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे असल्याने, न्यायालयाने उत्खनन प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी परदेशी निरीक्षकांना परवानगी दिली आहे. यामध्ये युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि रोमानिया या देशांचे राजनैतिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. पारदर्शकता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चेम्मानी येथील हे अवशेष १९८० आणि १९९० च्या दशकात श्रीलंकेत झालेल्या भीषण गृहयुद्धादरम्यानचे असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलमनआणि सरकारी दले यांच्यातील संघर्षाच्या काळात हे हत्याकांड घडल्याचे मानले जाते.
१९९८ मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी १९९८ मध्ये १५ सांगाडे सापडले होते. श्रीलंकेच्या मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे की, या ठिकाणी मृतदेह बेकायदेशीरपणे दफन करण्यात आले असून, या न्यायबाह्य हत्या असण्याची दाट शक्यता आहे. १९८३ मध्ये सुरू झालेला हा सशस्त्र संघर्ष २००९ मध्ये संपला, मात्र चेम्मानी येथील या कबरी आजही त्या काळातील क्रूरतेची साक्ष देत आहेत. आता पुन्हा सुरू होणाऱ्या उत्खननामुळे अनेक बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.