कुणीतरी सोबत बोलावं म्हणून ६ हजार रूपये देतो 'हा' श्रीमंत तरूण, का इतके एकटे होत चाललोय आपण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 13:06 IST2026-05-09T13:06:00+5:302026-05-09T13:06:45+5:30
Mental Health : एका श्रीमंत तरूणावर पैसे देऊन त्याच्यासोबत कुणीतरी बोलावं, अशी वेळ का आली असेल? हा मुद्दा ठरतो. हीच कारणं जाणून घेऊयात.

कुणीतरी सोबत बोलावं म्हणून ६ हजार रूपये देतो 'हा' श्रीमंत तरूण, का इतके एकटे होत चाललोय आपण?
Mental Health : म्हणतात ना, पैसा सगळं काही विकत घेऊ शकतो. पण तो मनातील एकटेपणा दूर करू शकत नाही. पण सोशल मीडियावर नुकतीच एका २७ वर्षीय श्रीमंत तरुणाची कथा व्हायरल झालीये. हा तरुण फक्त कुणीतरी सोबत बोलावं आणि वेळ द्यावा यासाठी दररोज जवळपास ६ हजार रुपये खर्च करण्यास तयार आहे. ऐकायला विचित्र वाटतं, पण हे आजच्या काळातील कटू सत्य आहे. लोक आलिशान घरांमध्ये राहत आहेत, पण मन मोकळं करून बोलायला कोणीच नाही.
ही घटना “Lonely in Luxury” चं उत्तम उदाहरण मानली जात आहे. या तरुणाकडे भरपूर संपत्ती आहे, पण तो अशा एका गोष्टीसाठी तळमळतो आहे जी कधीकाळी माणसांना सहज मिळायची. खरी आणि मनापासूनची संवादाची साथ. आजच्या धावपळीच्या लाइफस्टाईल आणि टेक्नॉलॉजीने आपल्याला जगाशी जोडले, पण आपल्या माणसांपासून दूर केले. आपण सोशल मीडियावर हजारो लोकांशी जोडलेलो असतो, पण प्रत्यक्ष आयुष्यात “कसा आहेस?” विचारणारे फार कमी असतात.
लग्नानंतरही एकटेपणा
या बातमीच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आणि समाजातील बरंच सत्य समोर आलं. एका युजरने लिहिलं, “अनेक विवाहित लोकही एकटे आहेत. फक्त समाजाच्या भीतीने ते हे मान्य करत नाहीत.” हे खरंच धक्कादायक वास्तव आहे. अनेक लोक एकाच घरात राहतात, एकाच बेडवर झोपतात, पण त्यांच्यातील संवाद गायब झालेला आहे. हे केवळ सोशल लोनलीनेस नाही, तर गर्दीत असूनही एकटे वाटण्याची अवस्था आहे.
सतत बोलण्याची गरजही ठरू शकते समस्या
एकटेपणाची आणखी एक दुसरी बाजू म्हणजे काही लोक “People Pleasing” चे बळी ठरतात. म्हणजेच, लोक आपल्याला सोडून जाऊ नयेत म्हणून सतत इतरांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करतात. एका युजरने सांगितले की, तो लोकांना गमावण्याच्या भीतीने सतत जास्त बोलतो, त्यांचं कौतुक करतो आणि स्वतःच्या समस्या सोडून इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. तज्ज्ञांच्या मते, ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करणारी स्थिती असू शकते.
पैसे देऊन मैत्री विकत घेता येते का?
रिलेशनशीप कोचच्या मते, एकटेपणा दूर करण्यासाठी पैशांच्या बदल्यात साथ मिळवणे हा हेल्दी मार्ग नाही. ते सांगतात की, “तुम्ही एखाद्या व्यक्तीचा वेळ विकत घेऊ शकता, पण त्याचे प्रेम, जिव्हाळा किंवा आपलेपणा नाही. जेव्हा नात्यात पैशांचा प्रवेश होतो, तेव्हा ते नाते नसून एक बिझनेस बनतो. खरी मैत्री ही भावनांवर आणि विश्वासावर टिकलेली असते.”
आपण इतके एकटे का होत आहोत?
डिजिटल विश्व
तंत्रज्ञान संवादासाठी निर्माण झाले होते, पण त्याने आपल्यात एक न दिसणारं असं अंतर निर्माण केलं. आता आपण इमोजी पाठवतो, पण त्यात भावना नसतात. प्रत्यक्ष भेटून होणाऱ्या गप्पा आता ‘ब्लू टिक’ आणि ‘सीन’मध्ये अडकून पडल्या आहेत.
दिखावा वाढलाय
सोशल मीडियावर प्रत्येकजण आपले आयुष्य परफेक्ट दाखवण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे खरे दुःखं, ताण आणि एकटेपणा फिल्टरच्या मागे लपून जातो. लोकांना जज केले जाईल या भीतीने ते मनातील गोष्टी बोलत नाहीत.
ही कहाणी फक्त एका श्रीमंत तरुणाची नाही, तर आजच्या समाजासाठी एक इशारा आहे. जर तुमच्या आयुष्यात असा एखादा व्यक्ती असेल ज्याच्याशी तुम्ही मनमोकळेपणाने बोलू शकता, तर विश्वास ठेवा तुम्ही त्या श्रीमंत तरुणापेक्षाही अधिक श्रीमंत आहात.