पहिल्याच पावसाने मान्सूनपूर्व कामांची पोलखोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:00 AM2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:00:23+5:30
दरवर्षी नगर परिषदेकडून मान्सूनपूर्व कामे केली जातात. यात प्रामुख्याने शहरातील गटारे, नाल्या, नाला यातील गाळाचा उपसा करुन पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची काळजी घेतली जाते. अन्यथा जोराचा पाऊस झाल्यास शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मान्सूनपूर्व कामासाठी नगर परिषदेला निधी सुध्दा उपलब्ध करुन दिला जातो. तसेच ही कामे साधारणपणे मे महिन्यापूर्वीच केली जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरात मंगळवारी (दि.२) सकाळच्या सुमारास जवळपास पंधरा ते वीस मिनिटे पाऊस झाला. थोड्या वेळ झालेल्या पावसामुळे मात्र शहरातील रस्त्यांवर आणि भाजीबाजारात पाणी साचले. पंधरा मिनिटे पाऊस झाला तर हे हाल आहेत तर किमान तासभर पाऊस झाल्यास शहराची काय अवस्था होईल याचा विचार न केलेलाच बरा. मात्र पहिल्या पावसामुळे नगर परिषदेच्या मान्सूनपूर्व कामाची पोलखोल झाली आहे.
दरवर्षी नगर परिषदेकडून मान्सूनपूर्व कामे केली जातात. यात प्रामुख्याने शहरातील गटारे, नाल्या, नाला यातील गाळाचा उपसा करुन पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची काळजी घेतली जाते. अन्यथा जोराचा पाऊस झाल्यास शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मान्सूनपूर्व कामासाठी नगर परिषदेला निधी सुध्दा उपलब्ध करुन दिला जातो. तसेच ही कामे साधारणपणे मे महिन्यापूर्वीच केली जातात. मात्र यंदा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आणि नगर परिषदेची यंत्रणा दुसऱ्या कामात व्यस्त असल्याने मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करणे शक्य झाले नाही. त्याचा परिणाम मंगळवारी सकाळी शहरात थोडाच पाऊस झाल्यावर दिसून आला. शहरातील भाजीबाजार, नेहरु चौक, सिव्हिल लाईनसह इतर भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळेच शहरातील नाल्या आणि गटारांची अद्यापही पूर्णपणे साफ सफाई झाली नसल्याची बाब पुढे आली. विशेष म्हणजे अद्याप पावसाळ्याला तशी सुरूवात झाली नाही. मात्र थोड्याच पावसाने शहराचे हे हाल झाले तर भर पावसाळ्यात काय स्थिती राहील याची चिंता शहरवासीयांना आतापासूनच सतावित आहे.
नगर परिषदेच्या नियोजनाचा अभाव
कोरोनामुळे यंदा नगर परिषदेची यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दुसºया कामात गुंतविण्यात आली.तर मान्सूनपूर्व कामे सुरू करण्यासाठी नगर परिषदेला जिल्हा प्रशासनाची अद्यापही मंजूरी मिळाली नसल्याची माहिती आहे.त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शहराचे हाल बिकट झाल्यास त्याला प्रशासनच जबाबदार राहणार यात शंका नाही.
भर पावसाळ्यात कशी करणार कामे
हवामान खात्याने यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचा आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर नगर परिषदेने अद्यापही मान्सूनपूर्व कामे पूर्ण केलेली नाही.त्यामुळे पावसाळ्यात नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यता आहे. तर नगर परिषद भर पावसाळ्यात नाल्यांची सफाई कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.