अनेक वर्षे वचनांचा पाऊस, पण नळ कोरडेच; धरण शेजारी असतानाही पाण्यासाठी आजही वणवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 08:50 IST2026-04-24T08:49:50+5:302026-04-24T08:50:52+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला 'हर घर नल, हर घर जल' हा नारा या भागात केवळ नावापुरताच असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

अनेक वर्षे वचनांचा पाऊस, पण नळ कोरडेच; धरण शेजारी असतानाही पाण्यासाठी आजही वणवण
लोकमत न्यूज नेटवर्क, कुडचडे : साळावली धरण अवघ्या काही अंतरावर असतानाही सावर्डे मतदारसंघातील दुलबानगर व कष्टी येथील ग्रामस्थांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला 'हर घर नल, हर घर जल' हा नारा या भागात केवळ नावापुरताच असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
अनेक वर्षांपासून आठवड्यातून केवळ दोन वेळा टँकरद्वारे पाणी दिले जाते, तेही गढूळ व अपुरे असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. ४५ वर्षापूर्वी बांधलेल्या धरणामुळे संपूर्ण दक्षिण गोव्याची तहान भागते, मात्र आम्ही धरणाशेजारी राहूनही पाण्याविना आहोत' असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. या धरणासाठी कुर्डीवासियांनी जमिनी सोडल्या तरीही आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागते, असे दुलबानगरवासीयांनी सांगितले.
टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असल्याने बॅरलमध्ये पाणी साठवून ठेवावे लागत आहे.
स्थानिक भावदास नाईक यांनी सांगितले की, गोवा मुक्त झाल्यापासून आम्ही पाण्याची वाट पाहत आहोत. कालेहून किंवा मिराबागहून पाणी देऊन आमची समस्या सोडवा अशी कित्येकवेळा विनंती केली पण आमचा आवाज सरकारकडे पोचत नाही. आठवड्यातून दोन वेळा मिळणारे किमान चार वेळा तरी पाणी द्यावे. आमची शेती उद्ध्वस्त झाली आहे. प्रशासनाने काले किंवा मिराबाग येथून पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
लक्ष्मण नाईक यांनीही टँकरने मिळणारे पाणी अपुरे असल्याचे सांगत, आठवड्यात किमान चार वेळा पाणी द्यावे, अशी मागणी केली. दरम्यान, गोवा मिनरल्स फाउंडेशनच्या निधीतून पाण्याची टाकी उभारण्याचा प्रस्ताव जमिनीच्या ना-हरकत दाखल्यातील त्रुटींमुळे गेली दोन वर्षे रखडल्याची माहिती पंच संजय नाईक यांनी दिली.
स्थानिक आमदार डॉ. गणेश गावकर यांनी या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे